कोल्हार भगवतीपूर (ता.राहाता) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे काम बांधा, वापरा, हस्तातंरित करा या तत्त्वावर करण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, पंचायत समिती सभापती नंदाताई तांबे, नंदू राठी, भास्करराव खर्डे, विश्वासराव कडू, प्रवरा बॅंकेचे अध्यक्ष अशोकराव म्हसे, जिल्हा परिषद सदस्या कविता लहारे, दिनेश बर्डे, नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, भाजपा राहाता तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, भाजयुमोचे सतीष बावके, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, गटशिक्षणाधिकारी काळे, सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे उपस्थित होते.
सत्तार म्हणाले, विखे पाटील म्हणजे चालते बोलते सरकार आहे. राजकारणापलीकडे जाऊन विकास कामांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. या कार्यक्रमाला मैत्रीखातर उपस्थित आहे. यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा बांधा, वापरा, हस्तातंरित करा या तत्वावर विकास करण्यात आला आहे. ही संकल्पना ग्रामीण विकासाला प्रेरणा देणारी ठरली. नगर जिल्ह्याचा हा पॅटर्न आता माझ्या सिल्लोड मतदार संघातही मी सुरू केला आहे.
आमदार राधाकृष्ण विखे म्हणाले, जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. या शाळांनीसुद्धा निर्माण केलेली गुणवत्ता ही लक्षणीय आहे. यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली आहे. येणाऱ्या काळात कोल्हार - पाथरे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याने या भागाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. नगर- मनमाड रस्त्याच्या कामाची निविदा निघाली असून हा मार्ग काॅंक्रीटीकरणातून विकसित होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिनी विखे यांनी केले. डॉ. भास्करराव खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.
.........................