केडगाव : जवळपास अर्ध्या नगर तालुक्याची तहान भागवणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे. महावितरणने योजनेतील गावांकडे असणाऱ्या ६० लाखांच्या वसुलीसाठी वीज जोडणी तोडल्याने ही योजना ऐन पावसाळ्यात बंद झाली आहे. योजनेतील समाविष्ट गावांकडे सुमारे साडे ६ कोटींची थकबाकी आहे.
तालुक्यातील ४४ गावांची असणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रत्येकवेळी कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत येत आहेत. मुळा धरणाजवळ बुऱ्हाणनगर योजना व मिरी तिसगाव योजनेचे एकत्रित वीज कनेक्शन आहे. या दोन्ही योजनेत नगर तालुक्यातील ३८, पाथर्डी तालुक्यातील २८, तर राहुरी तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांची वीज बिलाची थकबाकी ६० लाखांच्या घरात गेली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणने या योजनांचे वीज कनेक्शन तोडल्याने या दोन्ही योजना आता बंद पडल्या आहेत. यामुळे या योजनेतूनन आठवड्यापासून पाणी मिळू शकले नाही.
योजना बंद होऊ नये म्हणून नगर तालुका पंचायत समितीने तातडीने पावले उचलत सर्व थकबाकीपोटी १३ कोटी रुपये आतापर्यंत भरले आहेत. मात्र, थकबाकीची ६० लाखांची रक्कम भरल्याशिवाय योजनांचे वीज कनेक्शन सुरू होणार नाही, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. नगरपंचायत समितीने आज तातडीने योजनेतील समाविष्ट गावांतील ग्रामसेवकांची बैठक घेऊन थकबाकीचा धनादेश भरण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकीपोटी नगर तालुक्याने आतापर्यंत १४ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. मात्र, राहुरी व पाथर्डीमधील थकबाकीमुळे योजनेची आर्थिक अडचण वाढली आहे.
----------------------
वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने बुऱ्हाणनगर योजनेचे वीज कनेक्शन बंद केले आहे. जी गावे नियमित बिल भरतात त्यांच्यावरही अन्याय होत आहे. ज्या गावांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांचा पाणी पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
-संदेश कार्ले, अध्यक्ष घोसपुरी पाणी पुरवठा योजना समिती
-------------------
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकारी यांची बैठक होऊन जोपर्यंत ग्रामपंचायतीकडे असणारी वीजबिलाची माहिती येत नाही, तोपर्यंत कनेक्शन कट करू नये, असे आदेश दिले असताना महावितरणने बुऱ्हाणनगर पाणी योजनेचे कनेक्शन कट केले आहे. वास्तविक नगरपंचायत समितीने जवळपास १३ कोटी रुपये वीजबिलापोटी भरले आहेत. कनेक्शन कट झाले आहे; पण अधिकारी वर्गाला याची चिंता नाही.
-रामदास भोर, माजी सभापती