डोळ्यात पाणी, शाळेत गाणी ; शाळेचा पहिला दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:22 PM2018-06-26T22:22:50+5:302018-06-26T22:32:43+5:30

शाळेचा पहिला दिवस म्हणजे शिक्षणाचा श्रीगणेशा. मुलांच्या आणि पालकांच्याही कायम आठवणीत राहणारा हा क्षण. शाळा म्हणजे नेमके काय? हे माहीत नसलेल्या चिमुकल्यांना मात्र आपल्या ताई-दादासारखेच शाळेत जाण्याची उत्सुकता असतेच. पण शाळेच्या पहिल्या दिवशी आई किंवा बाबांनी शाळेत सोडल्यावर आई परतीला निघाली की चिमुकल्यांना असुरक्षित वाटते. शाळेच्या आकर्षणापोटी शाळा हवीय, पण सोबत आई हवीच. मग काय...आईने परतीचा मार्ग धरला की मुले शाळेत थांबेनाशी होतात. रडारड सुरू होते. आईचा हात अलगद सुटतो आणि रडता रडता शाळेतल्या गाण्यात, कवितेत, खेळात नकळतपणे मुले गुंतत जातात. ‘आई... तू मला सोडून जाऊ नको...’ असे म्हणणाºया चिमुकल्यांची आर्त साद मात्र त्याच्या माऊलींना परतू देत नाही. मुलांच्या काळजीपोटी माता शाळेबाहेरच रेंगाळत राहतात. शाळा सुटते आणि रडणारी मुले हसत-हसत पुन्हा आईच्या कवेत येतात. बस... हाच नेमका अनुभव होता शाळेच्या पहिल्या दिवसाचा.