किरीट सोमय्यांनी आरोप केलेले 'ते' नेते सध्या काय करतात? वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:49 PM2021-09-20T21:49:45+5:302021-09-20T21:55:55+5:30

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेकदा विरोधी पक्षातल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे, मनी लॉण्ड्रिंगचे आरोप केले. त्यांचं पुढे काय झालं..?

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्यानं होत असलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार वारंवार अडचणीत येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढत आहेत.

किरीट सोमय्या कालच कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले. त्यांना रोखण्याचा सीएसएमटीवर रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. मात्र सोमय्या तरीही महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कोल्हापूरसाठी रवाना झाले. विरोधकांवर थेट अंगावर घेणारे नेते अशी सोमय्यांची ओळख आहे.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक, अनिल परब, रविंद्र वायकर, भावना गवळी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांवर सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यापैकी अनेक नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी झाली आहे.

पेशानं सीए असलेले किरीट सोमय्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्यामुळे विरोधकांच्या अडचणी वाढतात. आधी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं होतं. त्यावेळीही त्यांनी दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांवर, मंत्र्यांवर आरोप केले होते. मात्र त्यांचं पुढे काय झालं..?

काँग्रेसचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर सोमय्यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. मधू कोडांशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या व्यवहारांवरून सोमय्यांनी आरोप केले होते. कंपनी अफेअर्स खातं आणि ईडीकडे त्यांची तक्रारदेखील केली होती.

७ जुलै २०२१ रोजी कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोमय्यांनी आरोप केलेल्या सिंह यांना भाजपनं उपाध्यक्षपद दिलं. मुंबई महापालिकेच्या तोंडावर सिंह यांनी भाजपनं मोठी जबाबदारी दिली.

नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सोमय्यांनी त्यांच्यावर ३०० कोटींच्या मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. २०१७ मध्ये सोमय्यांनी हा आरोप केला. २०१८ मध्ये राणेंनी त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यानंतर भाजपनं राणेंना राज्यसभेवर पाठवलं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद दिलं.

माजी मंत्री बबनराव पाचपुतेंवर सोमय्यांनी फसवणुकीचा आरोप केला. पॉन्झी स्किमच्या माध्यमातून १० लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. पाचपुतेंनी मंत्रिपदाचा वापर करून प्रकरण दाबल्याचा सोमय्यांचा दावा होता. २०१४ च्या निवडणुकीआधी पाचपुते भाजपमध्ये गेले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांवरदेखील सोमय्यांनी गंभीर आरोप केले. सिंचन प्रकल्पांमध्ये घोटाळे झाल्याचे आरोप त्यांनी केले. एफए कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून पैसे वळवल्याचा आरोप त्यांनी केला. सुनिल तटकरे यांच्यावरही त्यांनी आरोप केले. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र फडणवीस-पवार यांचं सरकार केवळ ३ दिवस टिकलं.

२०१२ मध्ये सोमय्यांनी छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणी आरोप केले. शेल कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो कोटींचं मनी लॉण्ड्रिंग केल्याचा त्यांचा आरोप होता. २०१६ मध्ये छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना अटक झाली.