आजपासून बदलले अनेक नियम, EPFO पासून न्यू टॅक्स रिजिमपर्यंत बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 08:43 AM2024-04-01T08:43:19+5:302024-04-01T08:59:11+5:30

१ एप्रिलपासून नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. आजपासून एलपीजीचे दर आणि वाहनांच्या किमतीवरही परिणाम दिसून येईल.

आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. १ एप्रिलपासून नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. आजपासून एलपीजीचे दर आणि वाहनांच्या किमतीवरही परिणाम दिसून येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान जाहीर केलेले बहुतांश नवीन कर नियमही याच दिवशी लागू होणार आहेत. आजपासून काय बदल होत आहेत ते जाणून घेऊया...

एलपीजी सिलिंडर - नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. १९ किलोचा एलपीजी सिलिंडर ३२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ३०.५० रुपयांनी कमी होऊन १७६४.५० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३२ रुपयांनी कमी झाली असून आता १८७९ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईबत सिलिंडरची किंमत ३१.५० रुपयांनी कमी होऊन १७१७.५० रुपये झाली आहे.

ईपीएफओ - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं तुमच्या फंड बॅलन्ससाठी ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टम लागू केली आहे. तुम्ही नवीन नोकरी सुरू करता तेव्हा तुम्हाला मॅन्युअल फंड ट्रान्सफरची विनंती करावी लागणार नाही. ईपीएफओ तुमची पीएफ शिल्लक तुमच्या नवीन कंपनीच्या खात्यात आपणहून जमा करेल.

न्यू टॅक्स रिजिम - १ एप्रिल २०२४ पासून नवीन कर प्रणाली भारतात डीफॉल्ट पर्याय बनेल. याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडत नाही तोपर्यंत तुमचा टॅक्स कॅलक्युलेशन नवीन नियमांनुसार केलं जाईल.

एनपीएस - १ एप्रिल म्हणजेच आजपासून एनपीएससाठी अधिक सुरक्षा प्रणाली लागू करण्यात येणार आहे. सिस्टममध्ये पासवर्डच्या माध्यमातून सीआरए सिस्टमपर्यंत पोहोचण्यासाठी टू फॅक्टर आधार आधारित ऑथेन्टिकेशनचा समावेश करण्यात येईल.

टोयोटा - आजपासून टोयोटा किर्लोस्कर मोटरची काही निवडक वाहनं महाग झाली आहेत. उत्पादन खर्च आणि परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीनं १ एप्रिलपासून त्यांच्या निवडक वाहनांच्या किंमती एक टक्क्यानं वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीने १ एप्रिलपासून आपल्या विशिष्ट मॉडेल्सच्या काही श्रेणींच्या किमती वाढवण्याची योजना आखली आहे.

सब्सिडी मिळणार नाही - इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली FAME-2 योजना सरकार ३१ मार्चनंतर वाढवणार नाही. या योजनेची मुदत वाढवण्याच्या वृत्ताचं खंडन करताना अवजड उद्योग मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. ३१ मार्चनंतर ई-वाहनांना अनुदान मिळणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

किआची वाहनं - ऑटोमोबाईल कंपनी Kia India ची वाहने आजपासून म्हणजेच १ एप्रिल २०२४ पासून तीन टक्क्यांनी महाग झाली आहेत. कंपनी Kia Seltos, Sonet आणि Carens मॉडेल्सची विक्री करते. कंपनीनं यावर्षी प्रथमच आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं आतापर्यंत भारतात आणि परदेशी बाजारात ११.६ लाख वाहनांची विक्री केली आहे.

विमासंबंधी नियम - भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (IRDAI) विविध नियम अधिसूचित केले आहेत. यामध्ये विमा पॉलिसी परत करणं किंवा सरंडर करण्याशी संबंधित शुल्क देखील समाविष्ट आहे. यामध्ये विमा कंपन्यांना असं शुल्क आधीच जाहीर करावं लागतं. जर एखाद्याने पॉलिसी जास्त काळ ठेवली तर सरेंडर व्हॅल्यू जास्त असेल, असं इरेडाचं म्हणणं आहे.