Namvistar Din : २५ वर्षांत झाला विद्यापीठाचा आंतर्बाह्य कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:41 AM2019-01-14T11:41:36+5:302019-01-14T11:49:32+5:30

नामविस्तार दिनाचे सिंहावलोकन करताना विद्यापीठाने मागील २५ वर्षांत मोठी झेप घेतली आहे. नामविस्तारानंतर विद्यापीठ तिसऱ्यांदा ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जात आहे. पहिल्या ‘नॅक’मध्ये ‘ब’ प्लस दर्जा मिळाला होता. दुसऱ्या ‘नॅक’मध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त केला.

Namvistar Din: In 25 years, drastic transformation of the university happens | Namvistar Din : २५ वर्षांत झाला विद्यापीठाचा आंतर्बाह्य कायापालट

Namvistar Din : २५ वर्षांत झाला विद्यापीठाचा आंतर्बाह्य कायापालट

ठळक मुद्देरौप्यमहोत्सवी नामविस्तार दिन विशेष  ऐतिहासिक लढ्याने मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचा वाढला टक्का

- राम शिनगारे 

औरंगाबाद : सिम्बॉल ऑफ नॉलेज असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी ऐतिहासिक लढा उभारण्यात आला होता. या लढ्याचा यशस्वी शेवट मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराने झाला. या घटनेला उद्या, सोमवारी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढ्यामुळे मराठवाड्याला आणखी एक विद्यापीठ मिळाले, तसेच विविध महाविद्यालये, विभाग सुरू झाले. यातून मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

नामविस्तार दिनाचे सिंहावलोकन करताना विद्यापीठाने मागील २५ वर्षांत मोठी झेप घेतली आहे. नामविस्तारानंतर विद्यापीठ तिसऱ्यांदा ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जात आहे. पहिल्या ‘नॅक’मध्ये ‘ब’ प्लस दर्जा मिळाला होता. दुसऱ्या ‘नॅक’मध्ये ‘अ’ दर्जा प्राप्त केला. तिसऱ्या सायकलचे मूल्यांकन काही दिवसांतच होणार आहे. त्यातही विद्यापीठ ‘अ’ प्लस दर्जा मिळवील. विद्यापीठाने गुणवत्ता आणि संशोधनासाठी ‘आयक्वॅक’ची स्थापना केली. यासाठी संचालक, समन्वयक,  सल्लागार, दोन संगणक सहायक, ७ प्राध्यापक समन्वयक कार्य करीत आहेत. अशा पद्धतीची रचना केलेल्या ‘आयक्वॅक’ विभागाची निर्मिती करणारे हे राज्यातील एकमेव विद्यापीठ असल्याचा दावाही कुलगुरू डॉ. चोपडे यांनी केला. संशोधनाच्या क्षेत्रातही विद्यापीठातील विविध विभागांची घोडदौड सुरूच आहे. देशात रामानुजन जिओ स्पेशल चेअर, मौलाना आझाद चेअर देशात ६ विद्यापीठांमध्ये आहेत. त्यातील एक आपल्याकडे आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. नुकतीच दीनदयाल उपाध्याय चेअर मंजूर झाली. त्यासाठीही ५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

नामविस्ताराच्या २५ वर्षांत विद्यापीठातील प्राध्यापकांनी विविध संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून ८० कोटी रुपये मिळवले. यात चार विभागांना ‘सॅप’ मिळाले. यात संगणक, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र आणि सांख्यिकीय विभागाचा समावेश आहे. याचवेळी डीएसटी फिस्टमध्येही संगणक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकीय विभागाचा समावेश आहे. यातून २० कोटी रुपयांचे अनुदान विविध संस्थांमार्फत मिळाले. स्कील एज्युकेशन प्रोग्राम सर्वात आधी सुरू करणारे हे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. यासाठी १०.५० कोटी रुपयांचा निधी मिळाला. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानातही विद्यापीठाने गरुडझेप घेतली आहे. मागील चार वर्षांत २७ कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

देशाला प्रति रामानुजन दिले
विद्यापीठातील गणित विषयाचे प्राध्यापक डॉ. बी.जी. पाचपट्टे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ६०० शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांना प्रति रामानुजन असे म्हटले जाते. त्यांचे संशोधनकार्य जर्मनस्थित ‘स्प्रिंगर व्हर्लेग’ या प्रख्यात प्रकाशन संस्थेने ५ खंडांत प्रकाशित केले आहे. एवढे मोठे स्कॉलर प्राध्यापक २००० साली सेवानिवृत्त झाले. विद्यापीठाने एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशात १०७ वे स्थान मिळवीत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आदी विद्यापीठांना मागे टाकले, असेही कुलगुरूंनी सांगितले.

नामविस्तारात मिळालेल्या विभागांची प्रगती
मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करण्याचा शासन निर्णय निघाला. तेव्हाच मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणकशास्त्र, पर्यटन आणि रसायन तंत्रज्ञान हे नवे विभाग मंजूर केले. यासाठी प्रत्येकी चार प्राध्यापकांच्या पदांना मंजुरी दिली. या २५ वर्षांत तिन्ही विभागांनी मोठी प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात तात्काळ रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमात त्यांची गणना होते. पर्यटनशास्त्र विभागाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रगडे आणि प्राध्यापिका डॉ. माधुरी सावंत यांनी आतापर्यंत १३ संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. देश-विदेशातील ३२ समित्यांवर कार्य करीत आहेत. विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर लाखो रुपयांचेपॅकेज मिळाले आहे. संगणकशास्त्र विभागात सद्य:स्थितीत डॉ. के.व्ही. काळे, डॉ. रत्नदीप देशमुख, डॉ. भारती गवळी यांच्यासह १२ प्राध्यापक कार्यरत आहेत. मागील २५ वर्षांत या विभागाने ५० पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. ज्याची किंमत १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. विभागातील प्राध्यापकांनी ५ पेटंट मिळवलेअसून, तब्बल ८४ विद्यार्थी संशोधनाचे काम करीत असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ.  गवळी यांनी दिली. केमिकल टेक्नॉलॉजी विभागात १० प्राध्यापक आहेत. या प्राध्यापकांनी १० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे संशोधन प्रकल्प पूर्ण केले असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिली. यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रवीण वक्ते आणि  डॉ. सचिन भुसारी यांनी पेटंट मिळवले आहे.

१८०० पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित
विद्यापीठातील विभागांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांनी मागील १५ वर्षांत १८०० पेक्षा अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. याशिवाय विविध परिषदांमध्ये २० हजारपेक्षा अधिक शोधनिबंधांचे वाचन केले आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन
विद्यापीठात मागील २५ वर्षांत विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती, राज्यपाल कार्यालयाचा अश्वमेध क्रीडा महोत्सव, व्हॉलीबॉल, खो-खो, टेबल टेनिस, बुद्धिबळ आदी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा विद्यापीठात भरविल्याची माहिती संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी दिली.

डीएनए बारकोंडिग केंद्र करते देशाचे नेतृत्व
विद्यापीठातील पॉल हार्बर्ड डीएनए बारकोडिंग हे संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करीत आहे. या केंद्राचे संचालक डॉ. गुलाब खेडकर यांनी ८ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मिळवला. याचवेळी इरासमस मुंडस या प्रकल्पांतर्गत विद्यापीठ देशाचे नेतृत्व करीत आहे. या आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या उपलब्धी आहेत. याशिवाय विद्यापीठाला नीती आयोगाने अटल इन्क्युबेशन सेंटरसाठी १० कोटी, जमनालाल बजाज इन्क्युबेशनसाठी १.५ कोटी आणि राज्य शासनातर्फे इन्क्युबेशन सेंटर निर्माण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले.

२५ वर्षांत १८ कुलगुरू
विद्यापीठाचा नामविस्तार झाला त्यावेळी कुलगुरू पदी डॉ. व्ही. बी. घुगे होते. त्यांच्यानंतर आयएएस व्ही.एन.करंदीकर,  डॉ. शिवराज नाकाडे, डॉ. बी.जी. पाचपट्टे, डॉ. व्ही.एस.लोमटे,  के.पी. सोनवणे, डॉ. डी.जी. धुळे, डॉ.एच.ए. गनी, आयएएस के.बी घुगे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. ए.जी. खान, आयएएस भास्कर मुंडे, डॉ. के. बी. पाटील, डॉ. विजय पांढरीपांडे, डॉ. पंडित विद्यासागर आणि ४ जून २०१४ पासून डॉ. बी.ए. चोपडे कुलगुरूपदी विराजमान आहेत.

Web Title: Namvistar Din: In 25 years, drastic transformation of the university happens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.