अव्वाच्या सव्वा वीजबिलाच्या दोन हजार तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:01:04+5:30
२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज वितरण कंपनीने तीन महिन्याचे बिल एकाच वेळेस पाठविले. या बिलामध्ये विजेचे वाढीव युनिट दर लागून आले. यामुळे ग्राहकांना जबर शॉक बसला आहे. यवतमाळ, पांढरकवडा या दोन विभागातून दोन हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुसदचा आकडा आणखी मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.
२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून जूनपर्यंत ग्राहकांना विजेचे बिल घरपोच मिळालेच नाही. या काळात ग्राहकांनी स्वत: रिडींग करून वीज वितरण कंपनीला कळवावे असे आवाहन वीज कंपनीने केले होते. प्रत्यक्षात कंपनीचा हा संदेश प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचला नाही. अनेकांना हे रिडींग करायचे कसे याचा अंदाजच आला नाही. यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याचे बिल जून अखेर ग्राहकांना मिळाले.
या बिलामध्ये वीज कंपनीच्या वाढीव रिडींग युनिटचा समावेश आहे. याशिवाय सर्व युनिट एकत्र झाल्याने त्याचे बिल वाढून आले, असा आरोप करीत ग्राहकांनी वीज कंपनी कार्यालयावर गत आठ ते दहा दिवसांपासून गराडा घातला आहे. दररोज शेकडो तक्रारी वीज कंपनी कार्यालयाकडे येत आहे. जे बिल ५०० ते हजार रुपयाचे होते, ते बिल ग्राहकांना आठ ते दहा हजारांच्या घरात मिळाले आहे.
वीज बिलाच्या वाढीव दराने सर्वसामान्य ग्राहक चकित झाले आहे. यातून त्यांनी वीज कंपनी गाठत बिल दुरुस्त करण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. कंपनीने ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेत कुठलेही बिल रिडींग पेक्षा जास्त नाही हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिल कमी होणार नाही, मात्र बिलाचे एकूण मूल्य दोन हप्त्यात विभागून देण्याबाबत कंपनी तयार आहे. प्रत्यक्षात ग्राहकाने ही वीज वापरली नव्हती, असे म्हणत ग्राहकांनी आम्हाला वाढीव बिल थोपविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
कोरोना काळात गर्दी नियंत्रित करण्यासाठी वारंवार सूचना दिल्या जात आहे. मात्र वीज कंपनी कार्यालयात एक खिडकी योजनेने प्रचंड गर्दी वाढली आहे.यातून कोरोना सारखा आजार पसरण्याचाही धोका आहे. कंपनीने ग्राहकांना सुविधा मिळावी यासाठी तक्रार जाणून घेण्याच्या जादा खिडक्या उघडाव्या अशी मागणी ग्राहक करीत आहे. वीज कंपनी यावर काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.