कोरोना विषाणूने घेतला दहावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:01:11+5:30
रविवारी मृत्यू झालेल्या इसमावर गेल्या काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. ‘क्रिटीकल’ अवस्थेतही त्याला वाचविण्यासाठी मेडिकल यंत्रणेने अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. हा ७५ वर्षीय मृतक मूळचा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे या गावातील रहिवासी होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नियंत्रणात आला-आला म्हणतानाच कोरोना विषाणू जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हातपाय पसरवित आहे. कोरोनाची लागण झालेल्या आणखी एका वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील हा कोरोनाचा साडेतीन महिन्यातील दहावा बळी ठरला.
रविवारी मृत्यू झालेल्या इसमावर गेल्या काही दिवसांपासून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात उपचार सुरू होते. ‘क्रिटीकल’ अवस्थेतही त्याला वाचविण्यासाठी मेडिकल यंत्रणेने अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. हा ७५ वर्षीय मृतक मूळचा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे या गावातील रहिवासी होता.
तर त्याच वेळी नेर तालुक्यातील मालखेड येथील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मेडिकल प्रशासनाला रविवारी प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह््यात सुरुवातीपासून आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या कोरोना रुग्णांची एकंदर संख्या २७३ इतकी वाढली आहे. तर ५७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत.
आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाने चार हजार ६६६ नमुने तपासणीकरिता पाठविले होते. यापैकी चार हजार ५०७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. १५९ रुग्णांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. गत २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाला ११५ रिपोर्ट प्राप्त झाले. यातील ११४ अहवाल निगेटिव्ह आले आहे. आयसोलेशन वार्डात सध्या ६८ नागरिक भरती आहेत. त्यांना निगराणीत ठेवण्यात आले आहे.
नेर, दारव्हा, दिग्रसचे १६ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनामुळे दहा मृत्यूची नोंद झाली असली तरी उपचारादरम्यान दुरुस्त होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत २०७ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. रविवारी नेरमधील सात, दारव्हा येथील पाच तर दिग्रसमधील चार रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डातून सुटी दिली.
इतर तालुके ‘अलर्ट’
दारव्हा, नेर तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही या दोन्ही ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. तर इतर तालुक्यांमधील यंत्रणाही ‘अलर्ट’ झाली आहे. वणी शहरात तर पाच दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. दिग्रस, उमरखेड, पुसद, महागाव, आर्णीतही दक्षता घेतली जात आहे.