लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:33 IST2026-03-17T15:31:29+5:302026-03-17T15:33:14+5:30
Yavatmal Crime: आतिशचे रुपालीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही तो तिच्या संपर्कात होता आणि तुझ्या पतीची हत्या करून तू माझ्यासोबत रहायला ये असे म्हणत होता.

लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध अडचणीचे ठरले! रुपालीने पतीच्या मदतीनेच एक्स बॉयफ्रेंडला संपवले
Maharashtra Crime News: लग्नानंतरही एक्स बॉयफ्रेंड सतत त्रास देतो. तुझ्या पतीला संपवून आपण सोबत राहू असे म्हणत असल्याने विवाहित तरुणीने पतीसोबत मिळून एक्स बॉयफ्रेंडचीच हत्या केली. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. १५ मार्च रोजी आतिश देशमुख या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या हत्येचा तपास केल्यानंतर प्रेम प्रकरणातून हे घडल्याचे समोर आले.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर मार्गावरील लासीना वाघापूर येथे १५ मार्च रोजी सकाळी गॅस गोदामाजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला होता. डोळ्यात तिखट टाकून त्याची चाकूने हत्या करण्यात आली होती.
एका कॉलमुळे अडकले पती-पत्नी
आतिश सुभाषराव देशमुख (३६, रा. गोविंदनगर, यवतमाळ) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे काका पंजाबराव मारोतराव देशमुख यांच्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
शनिवार (१४ मार्च) रोजी आतिश याला फोन कॉल आला होता. पोलिसांनी त्याच दिशेने तपास केल्यानंतर या हत्याकांडाचा उलगडला झाला. आतिश एकतर्फी अनैतिक संबंधासाठी विहितेवर दबाव आणत असल्याने पती-पत्नीने त्याची हत्या केल्याचे कबूल केले आहे.
त्यावरून एलसीबीने दाम्पत्याला अटक केली. अंकुश नागोराव खोडे (४३), रुपाली अंकुश खोडे (३८, रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
लग्नापूर्वी आतिश आणि रुपालीचे होते प्रेमसंबंध
आतिश याचे रुपालीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतर रुपालीने आतिशसोबतचे सर्व संबंध तोडून ती संसारात रमली होती. त्यानंतरही आतिश सतत तिला त्रास देत होता. इतकेच नव्हे तर अंकुश याचा खून करून तिला सोबत राहण्यास सांगत होता.
वारंवार समजूत काढूनही आतिश ऐकत नसल्याने तसेच याचा परिणाम मुलाबाळांवर होण्याचा धोका असल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली खोडे दाम्पत्याने दिली.
पोलिसांना तो कॉल संशयास्पद वाटला अन्...
एलसीबी पथकाने आतिश याला १४ मार्च रोजी रात्री ८:०० वाजता आलेल्या फोन कॉलवरच तपास केंद्रीत केला होता. एकूणच घटनास्थळावरील दृश्य पाहून पोलिसांना अनैतिक संबंधाचा संशय होता. त्याच दिशेने तपास केल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड झाला.
खोडे दाम्पत्याने आतिशपासून सुटका मिळविण्यासाठी त्याला नेर मार्गवरील जंगल परिसरात बोलावले. आतिश तेथे पोहोचल्यावर सर्वप्रथम अंकुशने त्याला लाथ मारून खाली पाडले, नंतर त्याच्या डोळ्यात तिखट टाकून रुपालीने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दगडाने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार केल्याचे पोलिसांना सांगितले.