यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान जनजागृती करण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. गरजू लोकांना जीवनदान देण्यासाठी नागरिकांनी अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी यावेळी केले.यावेळी मंचावर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, नगराध्यक्ष कांचन चौधरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, अभ्यागत मंडळाचे सदस्य जयंत झाडे, प्रवीण प्रजापती, अमोल ढोणे आदी उपस्थित होते.अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जेवढी जास्त जनजागृती होईल, तेवढा याचा फायदा लोकांना होणार आहे. माणसाच्या मृत्युनंतर सात अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात. त्यामुळे लोकांनी अवयवदानाचा संकल्प करावा. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातसुध्दा अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना आदींची बैठक घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी केल्या.अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी प्रास्ताविकातून अवयवदान जनजागृती अभियानादरम्यान राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. चव्हाण, शल्य चिकित्सक डॉ. धोटे, महाविद्यालयातील डॉक्टर्स, प्राध्यापक यांच्यासह लायन्स क्लब, रोटरी क्लब, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते.
अवयवदान जनजागृती समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:05 AM