विठ्ठलवाडी परिसरात कुख्यात गुंडाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:00 AM2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:07+5:30
आरिफचा निकटवर्तीय जॅक याचा वंजारीफैल परिसरात सरकारी शाैचालयाजवळ रविवारी वाद झाला होता. त्यात आरिफने मध्यस्थी केली. यातूनच हा वाद वाढत गेला. आरिफचा काटा काढण्यासाठी तिघांनी त्याला दारू पिण्याची ऑफर दिली. व्यसनाच्या आहारी गेलेला आरिफ त्यांच्यासोबत सोमवारी दिवसभर विविध ठिकाणी बसून दारू पित होता. रात्रीसुद्धा विठ्ठलवाडी भाजी मार्केटच्या मागे मैदानात मद्यपान केल्यानंतर आरोपींनी आरिफ शाहा याचा काटा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मार्केटच्या मागील मैदानात चाकूने भोसकून गुंड आरिफ शरीफ शाहा (रा. पिंपळगाव) याचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री १०.१५ वाजता उघडकीस आली. किरकोळ वादातून तिघांनी आरिफचा गेम केला.
गाैरव पांडे (रा. वंजारीफैल), अनिकेत ऐगडवार (२२) (रा. लोहारा) व राहुल मरकुटे (२५) (रा. वंजारीफैल) या तिघांनी आरिफचा चाकूने भोसकून खून केला, अशी तक्रार रजियाशहा शफीकशहा (४५) रा. ओमशिवम काॅलनी पिंपळगाव यांनी केली. त्यावरून खुनाचा गुन्हा शहर पोलिसांनी दाखल केला.
आरिफचा निकटवर्तीय जॅक याचा वंजारीफैल परिसरात सरकारी शाैचालयाजवळ रविवारी वाद झाला होता. त्यात आरिफने मध्यस्थी केली. यातूनच हा वाद वाढत गेला. आरिफचा काटा काढण्यासाठी तिघांनी त्याला दारू पिण्याची ऑफर दिली. व्यसनाच्या आहारी गेलेला आरिफ त्यांच्यासोबत सोमवारी दिवसभर विविध ठिकाणी बसून दारू पित होता. रात्रीसुद्धा विठ्ठलवाडी भाजी मार्केटच्या मागे मैदानात मद्यपान केल्यानंतर आरोपींनी आरिफ शाहा याचा काटा काढला. त्याला चाकूने भोसकून जागेवरच ठार केले. जागेच्या वादाचीही पार्श्वभूमी या खुनामागे आहे. आरिफवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. कधी काळी तो दिवटे टोळीतील सक्रिय सदस्य होता. गेल्या काही दिवसांपासून तो पिंपळगाव व वंजारीफैल परिसरात राहात होता. त्याच्या गुन्हेगारी कारवाया थंडावल्या असल्या तरी छुटपुट भांडणात तो सक्रिय होता. यातूनच त्याचा खून झाला.
खुनाच्या घटनेनंतर शहर पोलिसांनी काही तासांतच आरोपींचा छडा लावला. यातील गाैरव पांडे याला शहर ठाण्यातील अंकुश फेंडर व कमलेश भोयर यांनी अटक केली, तर अनिकेत ऐगडवार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. राहुल माळकुटे हा फरार होण्यात यशस्वी झाला. सततच्या त्रासाला कंटाळून आरिफचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
पुन्हा एका गुन्हेगाराचा निर्दयी अंत
यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात कुणाचीच दहशत फार काळ टिकली नाही. येथे प्रत्येक चौकात भाई आहे. त्यामुळे प्रत्येक भाईला कुणाच्या ना कुणाच्या हातून मरण अटळ आहे. हेच आरिफ शहा याच्या खुनानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. अगदी कमी वयातील मुलांनीच त्याचा गेम केला.