पुसदमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:00:25+5:30
‘पुष्पावंती’ अर्थात पुसद शहरच नव्हे, तर तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका आदी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. तालुक्यातून पैनगंगा व पूस ह्या दोन मोठ्या नद्या वाहतात. याच नदी व इतर नाल्यांचा स्त्रोतापासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी वाहून जाते. त्याला कुठेच अडविले जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यात गेल्या १५ ते २० वर्षांपासून भूगर्भातील पाणी पातळी खालावत आहे. त्यावर मात करण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ योजना कायमस्वरुपी राबविण्याची गरज आहे. मात्र या महत्वपूर्ण व तितक्याच गंभीर बाबींकडे प्रशासनासह नागरिकांचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
‘पुष्पावंती’ अर्थात पुसद शहरच नव्हे, तर तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका आदी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. तालुक्यातून पैनगंगा व पूस ह्या दोन मोठ्या नद्या वाहतात. याच नदी व इतर नाल्यांचा स्त्रोतापासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. मात्र हे सर्व पाणी वाहून जाते. त्याला कुठेच अडविले जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळी खालावत आहे. शहरावर ‘बास्केट इफेक्ट’मुळे सूर्य नारायणाचा दरवर्षी मोठा प्रकोप होऊन तापमान साधारणत: ४४ ते ४५ डीग्री सेल्सीयसपर्यंत पोहोचते. परिणामी दिवसेंदिवस पाणी पातळी खोल जात आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात. तालुक्यातील नदी, नाले आता कोरडे पडले आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता बळावली आहे.
तालुक्यातील वाळवंट म्हणून कुप्रसिद्घ असलेल्या माळपठार भागात तर दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई जाणवते. ४० गावे माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दरवर्षी कुचकामी ठरते. अशावेळी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प शहर व तालुक्यात ग्रामीण भागात राबविला गेला तर पाणीटंचाईवर सहज मात करता येणे शक्य आहे. यासाठी भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या शहर व तालुक्यात सूर्य आग ओकत आहे. परिणामी जमिनीतील पाण्याचे झरे, स्त्रोत खोल जात आहेत. यामुळे नदी, नाले, विहिरी, कोरड्या पडत आहे. शहरातील बंजारा कॉलनी, अशोक पार्क, शिवराज पार्क, देशमुखनगर, श्रद्घा कॉलनी, गांधीनगर आदी परिसरातील बोअरवेलची पातळी खालावली आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण होत आहे.
तालुक्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना शोधण्यासाठी मान्सूनपूर्वीच शहरी व ग्रामीण भागात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ योजना प्रभावीपणे राबविणे काळाची गरज बनली आहे. ही योजना सर्वत्र सक्तीने राबविल्यास पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रशासनासह नागरिकांच्याही दृढ इच्छाशक्तीची गरज आहे.
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा प्रकल्प शहरासह ग्रामीण भागातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, प्रत्येक शाळा, महाविद्यालये, मोठी प्रतिष्ठाने आदी ठिकाणी सक्तीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी भूजल सर्व्हेक्षण विभागाच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे.
प्रशासनासह नागरिकांच्या पुढाकाराची गरज
पावसाळ््यापूर्वी तातडीने शक्य तेवढ्या कार्यालयात रेन वॉटर हॉर्वेस्टिंगच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज आहे. अन्यथा पावसाचे पाणी पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणेच वाहून जाणार आहे. नागरिकांनी छतावरील पावसाचे पाणी अडवून ही योजना अंमलात आणल्यास भविष्यात पाणीटंचाईचा सामना करता येईल, हे तितकेच खरे.