धुवाधार पावसाने शेतजमिनी खरडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:19+5:30
यवतमाळ शहरात सायंकाळी ५ वाजता एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. घाटंजीमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजता थांबला. बाभूळगाव, आर्णी, महागाव, पांढरकवडा, दारव्हा, राळेगाव, दिग्रस, कळंब तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. पुसद तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत ढग कायम असले तरी पाऊस मात्र बरसला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस बरसला. यामुळे अनेक ठिकाणी दिलासा मिळाला. तर काही ठिकाणी नुकसानही झाले. सर्वाधिक फटका हातगाव आणि बोरीअरब शिवाराला बसला. जिल्ह्यात १३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
अनेक दिवसानंतर बरसलेल्या पावसाने काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार हजेरी लावली. हा पाऊस काही भागासाठी सुखकारक ठरला. तर काही भागासाठी नुकसानदायक राहिला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
घाटंजीत दुपारपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली होती. बाभूळगावला सायंकाळी पाऊस बरसला. यवतमाळातही पावसाने दमदार हजेरी लावली. बोरीअरब आणि दारव्हा भागातही पाऊस बरसला. महागावातही जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गत २४ तासात १३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
गेल्या २४ तासात यवतमाळात ४७ मिमी पाऊस बरसला, बाभूळगाव २५.५ मिमी, कळंब १५ मिमी, दारव्हा ४३ मिमी, दिग्रस २१ मिमी, आर्णी ७.९ मिमी, नेर ३३ मिमी, उमरखेड सहा मिमी, महागाव सहा मिमी, वणी पाच मिमी, मारेगाव सहा मिमी, झरी तीन मिमी, केळापूर सात मिमी, घाटंजी दोन मिमी, तर राळेगावात २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
नेर, घाटंजी, आर्णी, पांढरकवडात जोरदार हजेरी
यवतमाळ शहरात सायंकाळी ५ वाजता एक तास विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. घाटंजीमध्ये दुपारी २ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ६ वाजता थांबला. बाभूळगाव, आर्णी, महागाव, पांढरकवडा, दारव्हा, राळेगाव, दिग्रस, कळंब तालुक्यातही सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. पुसद तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत ढग कायम असले तरी पाऊस मात्र बरसला नाही. राळेगाव तालुक्यातही सायंकाळी ढग दाटून आले तरी पावसाला सुरवात झालेली नव्हती. मात्र संपूर्ण जिल्हाभरात रविवारी दिवसभर ढगाळी वातावरण कायम होते. पहिलाच मोठा पाऊस रविवारी बरसल्याने यवतमाळ शहरात गारवा पसरला.