लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकरी आधीच हवालदिल झाले. आता ऐन दसरा सणाच्या मध्यरात्रीपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा दसरा कडवट झाला आहे.अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतर खरिपातील उर्वरित सोयाबीन काढण्याची तयारी सुरू असताना तालुक्यात परतीच्या पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पीक काढणीत व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षीचा दसरा शेतकऱ्यांचा गोड होण्याऐवजी कडवट झाला आहे.सध्या ढगाळी वातावरण कायम आहे. शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळात अश्रू तरळताना दिसत आहे. आधीच अतिवृष्टीतील सानुग्रह अनुदान अद्यापही मिळाले नाही. आता परतीचा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. मायबाप सरकारने या गंभीर समस्येची दखल घेऊन आता तरी तातडीने मदत द्यावी, अशी अपेक्षा पुरस्कार प्राप्त शेतकरी अशोक वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे.
महागाव तालुक्यालाही झोडपले, शनिवारी दिवसभर पावसाची हजेरी
महागाव : शहरासह तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात गंजी मारून ठेवलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकरी दसरा सणात व्यस्त असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. अनेकांना रात्रीच उठून शेत गाठावे लागले. अनेक शेतकरी पहाटेपर्यंत सोयाबीन झाकण्यासाठी धडपड करताना दिसत होते. शनिवारीसुद्धा शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. या पावसामुळे कपाशीसुद्धा ओली झाली. त्यामुळे कपाशीच्या दर्जात फरक पडण्याची भीती सतावत आहे. परिणामी दरही कमी मिळण्याची शक्यता आहे.