दारव्हाची टँकर मुक्तीकडे झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:01:40+5:30
तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : कधीकाळी उन्हाळ्यात तालुक्यातील ४८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. आता त्याच तालुक्याने टँँकर मुक्तीकडे झेप घेतली आहे. यावर्षी अद्याप कुठेही टँकरची आवश्यकता भासली नाही. गेल्यावर्षी श्रमदानातून झालेली जलसंधारणाची कामे, गावकरी आणि पंचायत समितीने केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.
तालुक्यातील २७ गावांत कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवू शकते. त्यासाठी पंचायत समितीने विविध उपाययोजना केल्या. तालुक्यात ८६ ग्रामपंचायतीअंर्गत ९४ गावे व १३० वस्त्या येतात. यातील एक लाख ६३ हजार ८९९ नागरिकांना प्रतिदिन प्रतिव्यक्ती ४० लीटर पाण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता ६६ नळ योजना, ४६० विहिरी, ४५३ विंधन विहिरींसह इतर माध्यमांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र तोरणाळा, तेलगव्हाण, धामणगाव, करजगाव, कोहळा, सांगवी, राजीवनगर, पिंपळगाव, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, कुºहाड (खु.) निळोणा, राजुरा, जवळा, माहुली, घाटकिन्ही, हनुमाननगर, पाळोदी, भोपापूर, बोरगाव, शेलोडी, किन्हीवळगी, गौळपेंड, तपोना, कंझरा, सांगलवाडी, वागद (बु.) महातोली, खेड, पळशी, खोपडी (खु.), दयार्पूर, वडगाव (गा.), गाजीपूर, वागद (खु.) बोरी, मोरगव्हाण, विडूळ, निंभा, पिंप्री आदी गावांमध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती.
या गावांत उपाययोजना करुनही पाणीसमस्या दूर होत नसल्याने २४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र गेल्यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय, सामाजिक संघटना आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून अनेक गावात रोपवाटिका, वृक्षारोपण, शेततळे, माती नाला बांध, दगडी बांध, सिमेंट प्लग बंधारे, सीसीटी, सलग समतल चर, धरणातील गाळ उपसणे, माती परीक्षण आदी जलसंधारणाची कामे झाली. परिणामी मोठा जलसाठा निर्माण झाला.
पंचायत समितीतर्फे वार्षिक आराखड्याच्या माध्यमातून पाणीटंचाईचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे अनेक गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे.
२० गावात जून अखेरीस टंचाईची शक्यता
तेलगव्हाण, पिंपळखुटा, कुऱ्हाड (बु.), नांदगव्हाण, वरुड, गोरेगाव, मोरगव्हाण, विडूळ, बोरगाव, निंभा, पिंप्री, कुºहाड (खु.), भोपापूर, धामणगाव, करजगाव, राजुरा, कोहळा, निळोणा, सांगलवाडी, खोपडी (खु.), तोरणाळा, वागद (बु.), राजीवनगर, पिंपळगाव आदी गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याची सध्या गरज नाही. तथापि यातील व इतर काही, अशा २० गावांमध्ये जून अखेरपर्यंत टंचाई निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता तेथे खासगी विहीर अधिग्रहण, चार नळयोजना दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांनी सांगितले.