लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पीक बुडाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आता हेक्टरी केवळ ६ हजार ८०० रुपये देण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत असल्याने मेटाकुटीस आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यात ३४ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी, तर शिंदोला व पुनवट मंडळांतील पिकांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार केला. शुक्रवारी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी २३ कोटी २६ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. यंदा सप्टेंबर महिन्याअगोदर पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. वणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत करावी, अशा मागणीचे निवेदनही प्रशासन व शासनाला देण्यात आले. मात्र ही मागणी अव्हेरून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या अल्प मोबदल्यात आम्ही जगावे कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
बोंडसडीनंतर कपाशीवर आता लाल्याचा प्रकोप- सततच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली, तर सोयाबीनला अंकुर फुटले. या संकटातून शेतकरी सावरत नाही, तोच आता उरल्यासुरल्या कपाशीवर हळूहळू लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हादरून गेला आहे. यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.