कोलामपोडावरही झाली कोरोनाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:32+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी सर्वत्र लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जनताही आपआपल्या परीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कोलाम वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेतले असता, मागास समजल्या जाणाऱ्या कोलाम वस्त्यातसुध्दा कोरोनाला हाकलून लावण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात महिलांचा पुढाकार विशेषातत्वाने दिसून आला. घराबाहेर न पडण्याच्या सरकारच्या आवाहनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे.
देवेंद्र पोल्हे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : तालुक्यातील डोंगर माथ्यावर वसलेल्या कोलामपोडावरही आता कोरोना या आजाराविषयी जनजागृती झाली आहे. पोडावर वसाहत करून राहणारे आदिवासी बांधव कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व खबरदारी घेत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने तालुक्यातील जानकाई पोड येथे भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला, तेव्हा ही बाब पुढे आली.
सध्या कोरोनाच्या आजाराने विश्व भयभीत झाले असताना कोरोनाचा आजार चीन देशाचा असून कोरोनाला गावात प्रवेश करू न देण्याचा दृढ निश्चय कोलाम महिलांनी केला आहे. संपुर्ण गावात एकजूट करून उपाययोजनेसोबतच देवदेवतांकडे साकडे घातले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी सर्वत्र लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जनताही आपआपल्या परीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कोलाम वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेतले असता, मागास समजल्या जाणाऱ्या कोलाम वस्त्यातसुध्दा कोरोनाला हाकलून लावण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यात महिलांचा पुढाकार विशेषातत्वाने दिसून आला. घराबाहेर न पडण्याच्या सरकारच्या आवाहनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. कोलाम समाजात दिवसा काम न केल्यास रात्री चूल पेटत नाही, अशी स्थिती असतानाही कोरोनाच्या मुकाबल्यासाठी या भागातील आदिवासीदेखील धीटपणे उभे राहिले आहे. मारेगाव तालुक्यात कोलाम समाजाच्या ५६ वस्त्या आहेत. अशिक्षित, मागास, विकासापासून कोसोदूर असलेला समाज म्हणून त्यांची पुढारलेल्या समाजात ओळख. कोरोनाबद्दल यांना काय माहीत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अतीदुर्गम डोंगराळ जानकाई पोड गावात घरांची संख्या ९६ असून लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे. १०० टक्के कोलाम वस्ती असलेल्या या गावात नवीन लोकांना गावात येण्यास बंदी आहे. गावाबाहेर तशा सूचना फलक लावला आहे. हे बंधन घातल्यामुळे बाहेरील कोणतीही व्यक्ती थेट गावात येऊ शकत नाही.
रोजगार बुडाला तरी चालेल
तानेबाई आत्राम या वृद्ध महिलेने सांगितले की, हा चीनचा आजार आहे, आम्ही तो घेणार नाही आणि या भागात येऊही देणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारची काळजी आम्ही घेत आहो. मिरा टेकाम यांनी सांगितले, सरकारने हा आजार टाळण्यासाठी जास्त लोकांमध्ये न जाण्याचे व घरीच थांबण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आजार रोखण्यासाठी आम्ही सर्व सूचनांचे पालन करू, रोजगार बुडाला तरी चालेल. अशाच प्रतिक्रिया बायजाबाई आत्राम, झिबलाबाई मेश्राम, सैजाबाई आत्राम, पोतीबाई टेकाम आदींनी व्यक्त केल्या.