शेतमालाला ‘हमी’ नव्हेतर चक्क ‘कमी’ दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 05:00 AM2020-02-09T05:00:00+5:302020-02-09T05:00:08+5:30
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यावर्षी तालुक्यात कापूस ३१ हजार ८१२ हेक्टर, तूर पाच हजार ७३१ हेक्टरवर, तर सोयाबीन सहा हजार २३५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आता शेतीचा हंगाम संपत असल्याने हे सर्व नगदी पीके शेतकऱ्यांच्या घरात आली आहे.
देवेंद्र पोल्हे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : तालुक्यात शासकीय कापूस व तूर खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खासगी व्यापारी ‘हमी’ नाही, तर ‘कमी’ भावाने शेतमालाची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करित आहे. शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट बघता तालुक्यात शासकीय कापूस व तूर खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकीय प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यावर्षी तालुक्यात कापूस ३१ हजार ८१२ हेक्टर, तूर पाच हजार ७३१ हेक्टरवर, तर सोयाबीन सहा हजार २३५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आता शेतीचा हंगाम संपत असल्याने हे सर्व नगदी पीके शेतकऱ्यांच्या घरात आली आहे. परंतु तालुक्यातील शासनाच्या या तिनही पिकाच्या शासकीय खरेदी बंद आहे. खुल्या बाजारात शासकीय खरेदी बंद असल्याने सोयाबीन वगळता तूर व कापसाचे दर हमी भावापेक्षा खूपच खाली गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतकऱ्यांना पैशाची निकड आहे आणि शासकीय खरेदी बंद आहे. याचा फायदा खासगी व्यापारी उचलत आहे. आज कापूस खासगी व्यापारी पाच हजाराच्या कमी भावाने खरेदी करीत आहे, तर तुरीचे दरही खूपच खाली आहे. तालुक्यातील शेतमाल विक्रीअभावी कोंडीत सापडला असताना त्याला राजकीय पाठबळाची गरज आहे. तालुक्यात एकमेव असलेले सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र गेल्या दोन आठवड्यापासून बंद आहे. सीसीआयला कापसाची विक्री करताना शेतकरी वैतागले होते. शासनाची नाफेडतर्फे तालुक्याच्या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते. परंतु शहरातील एकाही संस्थेने प्रस्ताव न पाठविल्याने मारेगावात नाफेडचे तूर खरेदी केंद्र मिळाले नाही आणि आता हे केंद्र गोंडबुरांडा सोसायटीला मिळाल्याचे कळते. परंतु या सोसायटीकडे ना स्वत:चे गोडाऊन आहे, ना तूर खरेदीचा आहे. त्यामुळे ही सोसायटी खरच तूर खरेदी करेल काय, याबद्दल शंका आहे.
राजकीय उदासीनता
तालुक्यातील शेतकरी शेतमालाची योग्य दरात विक्री होत नसल्याने आणि शासकीय खरेदी केंद्र कायमचे बंद राहण्याच्या भितीने कोंडीत सापडला असताना शेतकºयांच्या पाठीशी पुरेशे राजकीय पाठबळ उभे असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत नाही. सीसीआयला कापूस विकताना कर्मचाऱ्यांची मुजोरी व संथ कापूस खरेदी, यामुळे शेतकºयांची दमछाक होत आहे. त्यातच हे केंद्र वारंवार बंद राहते. अशातच मारेगाव येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र नाही. याविरोधात राजकीय आवाज दबलेला दिसतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाºयांनी आता समोर येण्याची गरज आहे.
शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी प्रयत्नांची गरज
सध्या शहरासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल साठवून ठेवलेला आहे. त्यातच शासकीय खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी घुसमट होत आहे. लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहून कापूस व तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून आता केली जात आहे.