जातीव्यवस्था माणुसकीला नख लावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:06+5:30
जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देतात. यामध्येच जातिभेद आहे किंवा नाही? या प्रश्नाचे रहस्यमयी उत्तर दडलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जातीव्यवस्था ही माणुसकीला नख लावते आणि माणसाला माणसातून वजा करते. जोपर्यंत ती समूळ नष्ट होणार नाही तोपर्यंत जाती निर्मूलनाचे काम सुरूच ठेवावे लागेल. सर्वप्रथम विषमतेला छेद देण्यासाठी अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने जगाला दिलेल्या समताधिष्ठित विचारमूल्यांची पेरणी सातत्याने करीत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी, कलावंत अशोक बुरबुरे यांनी केले.
येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयोजनातील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘जातीचे निर्मूलन : बौद्ध समाज निर्मिती : शोध आणि बोध’ या विषयाला अनुसरून त्यांनी मार्गदर्शन केले.
जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देतात. यामध्येच जातिभेद आहे किंवा नाही? या प्रश्नाचे रहस्यमयी उत्तर दडलेले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण जनबंधू होते. प्रमुख पाहुणे डॉ. विवेक गुजर, डॉ. महेंद्र पखाले, डॉ. श्रीकांत मेश्राम, अजय गौरकार, इंजी. घनश्याम भारशंकर, इंजी. भीमराव गायकवाड, इंजी. संजय मानकर, अकादमीचे अध्यक्ष गोपिचंद कांबळे, सचिव आनंद गायकवाड, स्मृति पर्व व आयोजन समितीचे ज्ञानेश्वरराव गोरे, विलास काळे यांची उपस्थिती होती.
समारोपीय सत्राच्या प्रारंभी येथील सुप्रसिद्ध गायक कलावंत घनश्याम पाटील आणि संचाने भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे निवेदन कवी विनय मिरासे यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका प्रा. संदीप नगराळे यांनी मांडली. प्रास्ताविक अकादमीचे प्राध्यापक विलास भवरे यांनी केले. आनंद गायकवाड यांच्या बीज भाषणानंतर नीरज वाघमारे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. कवडू नगराळे व सुनील वासनिक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. नीलेश सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आंबेडकरी साहित्य कला अकादमीचे डॉ.प्रा. युवराज मानकर, डॉ. सुभाष जमदाडे, डॉ. साहेबराव कदम, सुमेध ठमके, आनंद धवणे आदींनी पुढाकार घेतला.