५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या १७ लाखाने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गत ५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या पावणे तीन पटीने वाढली आहे. पूर्वी १० लाख असलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत ५० वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या पावणे तीन पटीने वाढली आहे. पूर्वी १० लाख असलेली लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २७ लाख झाली आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येत १७ लाख वाढ नोंदविण्यात आली आहे. लोकसंख्या वाढत असली तरी निम्मे लोक कामकाज करतात आणि निम्मे लोक त्यावर विसंबून आहेत. वाढत्या गरजांच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न मात्र कमी आहे. यामुळे बहुतांश कुटुंबावर कर्जाचा डोंगर उभा आहे.
१९६१ केंद्र शासनाने जिल्ह्याची जनगणना केली, त्यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या १० लाख ९८ हजार ४७० होती. त्यावेळी लोकसंख्येचा दशवार्षिक वृध्दीदर १७.८६ होता. त्यावेळी ग्रामीण भागात नऊ लाख ५९ हजार ९४५ नागरिक राहत होते. तर एक लाख ३८ हजार ५२५ नागरिकांचा भार शहरावर होता. ५० वर्षापूर्वीपासून शहर आणि ग्रामीण भागात विकासाची स्पर्धा होती. प्रारंभी काही वर्षे ग्रामीण भागाकडे नागरिकांचा ओढा होता. यानंतरच्या कालखंडात शहरातील विकास कामांची गती वाढत गेली. तसतसा शहराकडे जाणारा नागरिकांचा लोंढा वाढत गेला.
गत वर्षामध्ये जिल्ह्यात लोकसंख्येचा वृध्दीदर सतत वाढत राहिला आहे. रोजगाराच्या संधी शोधत काही नागरिक शहरात वास्तव्याला आले आहे. यामुळे शहराची लोकसंख्या वाढत गेली आहे. २०११ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय जनगणना पूर्ण केली. या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २७ लाख ७२ हजार ३४८ झाली आहे. एकूण लोक संख्येच्या ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्याला आहे. तर तीस टक्के नागरिक शहरात वास्तव्याला आहे. २१ लाख ७२ हजार ३४८ लोक ग्रामीण भागात राहतात. तर पाच लाख ९८ हजार १५३ नागरिक शहरात राहतात. सध्याचा लोकसंख्येचा वृध्दीदर १२.७८ पर्यंत खाली आला आहे. परंतु ५० वर्षांचा तुलनात्मक अभ्यास केला तर ५० वर्षापूर्वी एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक शहरात राहत होते. आता हा आकडा ३० टक्क्यांवर आला आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे.
शिक्षण, रोजगार आणि सोई सुविधा यामुळे शहरी भागात लोकसंख्या वर्षागणिक वाढत आहे. शहराचा भूभागही वाढत आहे. याशिवाय गावाची लोकसंख्या कमी होत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत रोजगारामध्ये पाहिजे तशी वाढ झाली नाही. याचे कारणही तसेच आहे.
जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न १८२ रूपये
अंकेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न १८२ रूपये आहे. हातात पडणारे हे उत्पन्न कुटुंबासाठी अपुरे आहे. यामुळे कृषीसह इतर क्षेत्रात कर्ज घेऊन उद्योग उभारण्यासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळतात.
स्त्री पुरूष असमानता कायमच
जिल्ह्याच्या दरहजारी स्त्री पुरूष गणनेचा विचार केला तर जिल्ह्यात सरासरी दरहजारी पुरूषामागे ९५२ स्त्रिया आहेत. ग्रामीण भागामध्ये दर हजारी पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण ९५० आहे. तर शहरी भागात दर हजारी पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण ९६२ आहे.