जालन्याच्या घटनेचे सर्वदूर पडसाद; रिसोड शहरात पाळला कडकडीत बंद
By संतोष वानखडे | Updated: September 3, 2023 12:23 IST2023-09-03T12:22:57+5:302023-09-03T12:23:29+5:30
मराठा समाजात असंतोषाची लाट, वाशिम जिल्ह्यात पडसाद

जालन्याच्या घटनेचे सर्वदूर पडसाद; रिसोड शहरात पाळला कडकडीत बंद
संतोष वानखडे, वाशिम : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठाआरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशीही ३ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ रिसोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठाआरक्षणासंदर्भात उपोषण सुरू होते. आंदोलनादरम्यान १ सप्टेंबर रोजी आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्याने यात अनेकजण गंभीर जखमी झाले. या आंदोलनामुळे मराठा समाजात असंतोषाची लाट निर्माण झाली असून, वाशिम जिल्ह्यातही पडसाद उमटत आहेत.
शनिवारी (दि.२) मराठा समर्थकांनी वाशिम शहरात रस्त्यावर उतरुन घटनेचा निषेध नोंदविला होता. रविवारी (दि.३) रिसोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, मराठा समाजाची माफी मागावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.