मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने मिळणार पाणी - प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 02:15 IST2025-11-27T02:15:30+5:302025-11-27T02:15:52+5:30
मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे.

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने मिळणार पाणी - प्रताप सरनाईक
मीरारोड- मीरा भाईंदरच्या जनतेच्या पाणी टंचाईवर प्रमुख तोडगा असलेल्या सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेतील अडथळा ठरलेल्या कमी वीज पुरवठा आणि टनर्सफॉर्मर उभारणीच्या कामांना मंजुरी मिळाल्याने मार्च २०२६ पासून सूर्याचे पाणी मीरा भाईंदरकरांना मिळण्यास सुरवात होईल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ह्या बाबत घेतलेल्या बैठकी नंतर सांगितले आहे.
मीरा भाईंदर शहराला सध्या एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरण कडून मिळणारे पाणी अपुरे असून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पाणी टंचाई गेल्या अनेक वर्षां पासून भेडसावत आहे. सूर्या धरण योजनेतून पाणी पुरवठा सुरु होण्याची शहरातील नागरिकांना प्रतीक्षा आहे. सुर्या उपसा जलयोजना टप्पा–२ मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा तसेच कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात ह्या बाबत बैठक घेतली. बैठकीस मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल नांदुरकर, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता चेतन बेंबाळे, महापारेषणचे कार्यकारी अभियंता अजय आठवले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संदिप नलावडे आदी अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीत संबंधित अधिकार्यांसोबत विस्तृत चर्चा झाली. सुर्या जलयोजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी सध्याचा ३३ केव्ही वीजपुरवठा अपुरा आहे. आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्याने पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत आहे. त्यावर महापारेषणने सुर्या जलयोजनेसाठी १३२ केव्ही उच्च-दाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती दिली आहे. हा वीजपुरवठा दिवा मार्गे नव्याने तयार करण्यात येणाऱ्या १३२ केव्ही पारेषण प्रणालीद्वारे मिळणार आहे. या नव्या वीजपुरवठ्यामुळे पंपांची कार्यक्षमता १००% होईल, योजनेंतील २१८ लाख लिटर दशलक्ष लिटर पाणी पूर्ण क्षमतेने उचलणे शक्य होईल, नव्या पारेषण लाईन व ट्रान्सफॉर्मरची उभारणी सध्या वेगाने सुरू असून, सर्व कामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
तर योजनेची उर्वरित कामे देखील मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. नवीन वीजपुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा–भाईंदरचा जलपुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजांस अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुर्या जलयोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.