पालघर: राज्यातील पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील एसएमबिसी बँकेच्या ८० लाखाच्या सीएसआर फंडातून डहाणू तालुक्यात नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार असून ह्या योजनेचा संपूर्ण आराखडा जपानचे तंत्रज्ञ स्वत: बनवणार आहेत.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाघाडी गावात सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन व एसएमबीसी बँक यांच्यात सामंजस्य करार झाला असून त्यानुसार एसएमबीसी बँकेच्या फंडातून हा निधी प्राप्त होणार आहे. डहाणू च्या दुर्गम भागात पाण्याचे असणारे दुर्भिक्ष्य या योजनेमुळे दूर होणार आहे. ८० लाख रुपये खर्चून ही योजना जॅपनीज तंत्राने उभी राहणार असून त्यामुळे एक वेगळी ओळख ह्या योजनेची होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व जपानच्या अधिकाऱ्यांसमवेत पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांची एक बैठकही नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे योजनेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
वाघाडीत जपानी पाणीयोजना
By admin | Published: March 22, 2017 1:16 AM