येत्या १५ दिवसांत कचरा समस्या निकाली काढण्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आयुक्तांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 12:03 AM2021-01-26T00:03:38+5:302021-01-26T00:03:59+5:30
वसई-विरार महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने पालिकेला प्रत्येकी ८० लाख रुपये दंड बजावला आहे.
विरार : वसई-विरार शहरातील कचरा समस्या गंभीर आहे. शहरात रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग दिसतात. ही समस्या गंभीरतापूर्वक घ्या; अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा. फेब्रुवारी महिन्यात ही समस्या दिसता कामा नये. ही समस्या निकाली काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत देतो, अशा शब्दात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वसई-विरार महानगरपालिका आयुक्तांना धारेवर धरले.
वसई-विरार महापालिकेच्या सर्व क्षेत्रांतील विकासकामांसंदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी १० वाजता पालिका सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व तहसीलदार व सर्व पालिका अधिकारी उपस्थित होते.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन व त्यावर प्रक्रिया होत नसल्याने हरित लवादाने पालिकेला प्रत्येकी ८० लाख रुपये दंड बजावला आहे. शिवाय या सगळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी दिलेली मुदत उलटून गेल्याने डिसेंबर २०२० नंतर प्रत्येक महिना २० लाख रुपये इतका अतिरिक्त दंड ठोठावला आहे. ही बाब आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थित करत पालकमंत्री व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पालिका यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांचे स्पष्टीकरण पालिका अधिकाऱ्यांकडे मागितले. सर्वपक्षीय नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतानाच पालिका अधिकाऱ्यांना जाबही पालकमंत्री दादा भुसे यांनी विचारला. यावर या वास्तू निर्माणाच्या अखेरच्या टप्प्यात असून लवकरच त्यांची कामे पूर्ण होतील, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींना दिले.
शहरात रस्तोरस्ती आढळले कचऱ्याचे ढीग
वसईत बैठकीला येत असताना शहरात रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग दिसल्याचे निरीक्षण पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नोंदवले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अमृत योजनेच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यावरही अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. याच अनुषंगाने अनधिकृत नळ कनेक्शन आणि अनधिकृत बांधकामे, पावसाळ्यात शहरात तुंबणारे पाणी हे प्रश्नही बैठकीत चर्चेला आले. या बैठकीत महापालिकेच्या निर्माणाधीन नवीन वास्तू, हॉस्पिटल्स, नाट्यगृह आणि अन्य विकासकामांवरही साधक-बाधक चर्चा झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतानाच पालिका अधिकाऱ्यांना जाबही पालकमंत्री दादा भुसे यांनी विचारला.