वसईतील मीठ व्यवसायालाही भेडसावते कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:32 AM2020-06-01T00:32:25+5:302020-06-01T00:34:48+5:30

पारंपरिक व्यवसाय : कामगारांसोबत उद्योजक संकटात; तीन महिने उत्पादन बंद

The corona crisis also plagues the salt business in Vasai | वसईतील मीठ व्यवसायालाही भेडसावते कोरोनाचे संकट

वसईतील मीठ व्यवसायालाही भेडसावते कोरोनाचे संकट

Next

आशीष राणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : जगभर व देशभरात सध्या कोरोनाचे संकट असताना त्याचा फटका वसईतील मीठ कामगार व उत्पादकांनाही बसला आहे. ऐतिहासिक वसईचा पारंपरिक व्यवसाय म्हणून गणला जाणाऱ्या मिठाचे उत्पादन मागील तीन महिने सलग बंद राहिल्याने यंदा केवळ २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे वसईतील मीठ उत्पादकांनी सांगितले.
खाºया मिठाची पावसाळ्यानंतर विक्रीच होणार नसल्याने मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून येथील पापडी उमेळमान येथील खाडी किनारी ढिगारे करून त्याला गवताने झाकण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सफाळे, माकूनसार, माहीम, वसई पूर्व व पश्चिम आदी खाडी व किनारपट्टीचा ग्रामीण व शहरी भाग मिठागरांसाठी ओळखला जातो़. शेती व मासेमारीप्रमाणे वसईतही अनेक वर्षांपासून पारंपरिक मीठ उत्पादनाचा व्यवसाय केला जातो.
पालघर जिल्ह्यातील वसई-डहाणू या पट्ट्यात १५ ते १८ हजार एकरांवर मिठाचे उत्पादन होते. यातील निम्मी जागा ही राज्य सरकारची तर निम्मी जागा केंद्र सरकारच्या मालकीची आहे. वसईतले अनेक स्थानिक भूमिपुत्र येथे मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. वसई-विरारमधील १५७५ एकर जागेवर मीठ उत्पादन घेतले जाते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात हे काम केले जाते.
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच लॉकडाउन असल्याने तयार झालेले मीठ उचलण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असून यंदा मिठाचे सर्वात कमी असे २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे राज्य मीठ उत्पादक संघाचे वसईतील उमेळमान ग्रामस्थ तथा अध्यक्ष मदन किणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मिठागरात काम करण्यासाठी दरवर्षी विविध ठिकाणांहून मजूर येत असतात. त्यांच्या साथीने मिठागरात पाणी, मीठ खेचणे, योग्य ती मशागत करणे, तयार झालेले मीठ उचलणे अशी कामे केली जातात. मात्र या वर्षी कोरोनामुळे मिठागरात काम करणारे कामगार मार्चपासूनच निघून गेले होते. त्यामुळे वसई-विरारमधील मिठागरे ओस पडली होती.

मिठावरील खर्च वाया; व्यापारी - मजुरांचे मोठे नुकसान
मार्च महिन्यापासून मिठाचे उत्पादन घेणे बंद झाले होते. वसईत तयार झालेले मीठ उचलण्यास एप्रिलपासून सुरुवात करून त्याच्या राशी तयार केल्या जातात. मे महिन्यात पावसाळ्याच्या आधी या मिठाच्या ढिगाऱ्यांवर गवत आच्छादले जाते. आॅक्टोबर महिन्यात हेच मीठ गोणीत भरून व्यापाºयांपर्यंत पोहोचविले जाते. या २५ टक्के मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी सध्या मिठाच्या ढिगाºयांना गवताने संरक्षित केले जात आहे.
वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो. परंतु, त्यांना १ रुपया १० पैशांनी मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो. परंतु, व्यापाºयांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते. आधीच मिठाला भाव कमी, त्यात कोरोनाचे संकट यामुळे मिठावर केलेला खर्च यंदा पूर्णपणे वाया गेला आहे.

Web Title: The corona crisis also plagues the salt business in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.