असं का? दहा वर्षांपूर्वी १० ग्रॅम सोन्याचे व एक क्विंटल कापसाचे भाव होते सारखेच, आज मोजावा लागतो दुप्पट कापूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:40 IST2025-10-17T20:39:33+5:302025-10-17T20:40:04+5:30
शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच : नापिकीने बसला आर्थिक फटका, शासनाने मदत देण्याची मागणी

Why is that? Ten years ago, the price of 10 grams of gold and one quintal of cotton were the same, today cotton costs twice as much.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी): विविध प्रकारच्या वस्तूंमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने व जागतिक बाजारपेठेत सोन्याला अधिक मागणी वाढल्यामुळे दिवसेंदिवस सोन्या-चांदीच्या मागणीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येते. परिणामी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहे. मात्र, शासनाने शेतकरी विरोधी धोरण राबवत कधी आयात शुल्क रद्द करून, तर कधी निर्यातबंदी घालून, निर्यात शुल्क वाढवून, वायदेबाजारात शेतमाल व्यवहारावर बंदी घालून, देशातील बाजारपेठेत सर्वच शेतमालाचे भाव पडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
हल्ली शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापसासह सर्वच शेतमालाचे भाव पाताळात शिरले असल्याचे वास्तव आहे. यामुळे शेतकरी अधोगतीला पोहोचला आहे. याशिवाय निसर्गसुद्धा शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून अतिवृष्टीमुळे उभे पीक जमीनदोस्त होत आहे. परिणामी दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. असे असताना सरकारने हेक्टरी ८ हजार रुपये तुटपुंजी नुकसानभरपाई जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असल्याची ओरड आहे. दिवसागणिक सोन्या-चांदीचे दर वाढत आहेत. शेतमालाची स्थिती याउलट आहे, शेतमालाचे भाव पडत असल्याने लागवड खर्च निघणे कठीण आहे.
कापसाचे १४ वर्षांतील भाव
वर्ष भाव
२०१२ ३८८०
२०१३ ४१८०
२०१४ ४९३८
२०१५ ४०७०
२०१६ ४३९०
२०१७ ५३८०
२०१८ ४७८४
२०१९ ५६४०
२०२० ५३८७
२०२१ ५४३०
२०२३ ८९५४
२०२४ ७१८०
सोयाबीनचे दहा वर्षांतील भाव
वर्ष भाव
२०१४ ३३२४
२०१५ ३२३५
२०१६ ३५१९
२०१७ २८२४
२०१८ २९२२
२०१९ ३३५१
२०२० ३४२०
२०२१ ४१६६
२०२२ ५४९१
२०२३ ४९९१
२०२४ ४४५०
"पूर्वी १० ग्रॅम सोन्याचे भाव आणी १ क्विंटल कापसाचे भाव जवळपास सारखे होते. आज सोन्यासह कापसाच्या भावाची तुलना केल्यास १ ग्रॅम सोने खरेदीसाठी २ क्विंटल कापूस विकावा लागतो. हा सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे. शेतमालाचे भाव सरकारच्या धोरणांनी पाडले."
- मधुसूदन हरणे, प्रदेशाध्यक्ष, स्व.भा.प.
"जागतिक पातळीवर चांदीचा तुटवडा निर्माण झाल्याने व मागणी वाढल्याने भाव प्रचंड वाढले आहेत. चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे."
- गिरीश राठी, सराफा व्यावसायिक.
"यंदा अतिवृष्टीमुळे उभ्या पिकाची धूळधाण झाली; पण जे काही उरलेसुरले पीक आहे त्याला तरी सरकारने लागवड खर्चानुसार भाव द्यावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी."
- प्रवीण भोयर, शेतकरी.