पांढरे सोने घरी नेण्यासाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:01:02+5:30
दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. कापूस वेचनीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतदही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. कापूस वेचनीला प्रारंभ करण्यापूर्वी बळीराजाकडून शेतात सीतदही उरकविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपाशीची बोंड गळून पडली. तर पावसामुळे ओले झालेली बोंड सडली. यामुळे उत्पादनाची आशा मावळली. यात काही शेतकºयांच्या शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. या बोंडातून कापूस बाहेर येत आहेत. तो शेतात ठेवणे सध्या धोक्याचे असल्याने तो वेचण्याचे काम शेतकºयांकडून सुरू झाले आहे. विदर्भातील शेतकºयांचे प्रमुख उत्पादन म्हणून कापसाकडे पाहिल्या जाते. कधी भावाच्या कमी अधिक प्रकारामुळे कापसाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे.
मागील वर्षी मिळालेल्या दरामुळे शेतकऱ्यांकडून कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यात आले. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पऱ्हाटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून आता सुरू करण्यात आले आहे. कापूस वेचणीला प्रत्यक्षात प्रारंभ करण्यापूर्वी परंपरेनुसार शेतकºयांकडून शेतात सीतदही केली जात आहे. सध्या कापसाच्या शेतात बळीराजा या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
अशी करतात सीतदही
शेतातील कापूस घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात सर्वत्र दही शिंपडण्यात येते. हे दही शिंपडण्यापूर्वी कापसाच्या दोन झाडांच्या मध्ये वाकाचा (आंबाडीच्या झाडाची साल) पाळणा बांधून शेतातील पाच गोटे पाण्याने धुऊन ते एका नव्या कापडाचा पाळणा करून टाकण्यात येतात. येथे त्याची पूजा करून तेथे नैवेद्य ठेवण्यात येतो. यानंतर सीतदही झालेल्या परिसरातील कापूस काढून तो एका टोपल्यात गोळा करून तो घरी आणून देवघरात ठेवतात. त्याची पूजा करण्यात येते. यानंतरच कापसाच्या वेचनीला प्रारंभ होतो.