नियम धाब्यावर बसवून उडाले विवाह सोहळ्यांचे बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:15+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना लपून-छपून कार्यक्रम, बैठका उरकणाऱ्यावर भर दिला जात असून यात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्यादा प्रशासनाने घालून दिली असली तरी प्रत्यक्षात २०० ते ३०० लोक उपस्थित राहत असून प्रशासनाच्या डोळ्यात नागरिकांकडूनच धूळ झोकली जात आहे. कोरोनाच्या या संकटकाळात राजकीय पक्षही भान हरपले आहेत. त्यांच्याकडूनही बिनधास्तपणे सत्कार सोहळे आयोजित केले गेले. या प्रकरणात नुकतेच आयोजकांसह उपस्थितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदी लागू असल्याने बैठक घेण्यावरही बंदी असताना लपून-छपून चार भिंतींआड विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून बैठका घेतल्या जात आहेत. विवाह सोहळ्यापूर्वी होणारा मांसाहारी जेवणावळीचा कंदुरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला दोनशेवर नागरिकांची गर्दी उसळली. यातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने इतवारा परिसरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची बाब लक्षात घेत प्रशासनाने तीन दिवस तातडीचे लॉकडाऊन जाहीर केले. चार महिन्यांपासून लॉकडाऊनच राहावे लागत असल्याने नागरिक वैतागून गेले आहेत. ‘चूक एकाची आणि मनस्ताप सर्वांना’ असा काहीसा प्रकार नागरिकांच्याच बेशिस्त कृतीमुळे घडत आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असताना त्यांच्याकडूनच बंदीच्या काळातही कार्यक्रम, बैठका आणि विवाह सोहळ्यात मर्यादेपेक्षा अधिक गर्दी जमवून बेकायदेशीर कृत्य केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने यापुढे समारंभांना परवानगीच देऊ नये, असा सूर सुजाण नागरिकांतून आळविला जात आहे.