शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा मालवाहू वाहनातून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:21+5:30
निंबोली गावातील ग्रामस्थांची सर्व उपजीविका शेतीवर असल्याने जवळपास ३५० घरे अद्याप जुन्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी त्यांची कुटुंबेही आहेत. नवीन पुनर्वसित ठिकाणी केवळ १२ ते १३ घरे नागरिकांनी बांधलेली आहेत. जुन्या ठिकाणी म्हणजे जुन्या निंबोली गावातच सर्व ग्रामस्थ वास्तव्याला असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. परिसर वर्धा प्रकल्पात गेल्याने गावात मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे.
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील निंबोली गावात अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना चक्क मालवाहू चारचाकी वाहनातून उभ्याने प्रवास करून शैक्षणिकस्थळी जावे लागत असल्याचे चित्र आहे. यात शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असून जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
निंबोली गावातील ग्रामस्थांची सर्व उपजीविका शेतीवर असल्याने जवळपास ३५० घरे अद्याप जुन्या ठिकाणी आहे. त्याच ठिकाणी त्यांची कुटुंबेही आहेत. नवीन पुनर्वसित ठिकाणी केवळ १२ ते १३ घरे नागरिकांनी बांधलेली आहेत. जुन्या ठिकाणी म्हणजे जुन्या निंबोली गावातच सर्व ग्रामस्थ वास्तव्याला असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. परिसर वर्धा प्रकल्पात गेल्याने गावात मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता पूर्णत: उखडून गेला आहे. यामुळे ग्रामस्थांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत. या गावातून ३० ते ३५ विद्यार्थी पाचवी ते दहावीचे शिक्षण घेण्यासाठी जातात, तर अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी २५ ते ३० विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी जातात. मात्र, गावात बसच येत नसल्याने मालवाहू वाहनातून नाईलाजाने जनावरासारखे उभ्यानेच शिक्षणासाठी जावे लागत आहे.
६० टक्के शेती संपादित
तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील संपूर्ण घरे निम्न वर्धा प्रकल्पाने गिळंकृत केली. या गावकऱ्यांची ५० ते ६० टक्के शेतीही या धरणाकरिता संपादित करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांचे आर्वी देऊरवाडा या मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या बाजूला पुनर्वसन करण्यात आले.
वाहतुकीसाठी रस्ता व्यवस्थित नाही, हे खरे. मात्र, लहान वाहने मालवाहू गावात येतात. एसटी ला पावसाळ्यात रस्त्याची अडचण होते, हे ठिक आहे पण आता हिवाळा उन्हाळा असल्याने बसेस गावात न येण्यास काय अडचण आहे? नाईलाजाने जीव धोक्यात घालून मालवाहू गाडीतून जावे लागते. बसफेरी सुरू करण्यासाठी निवेदन ही दिले; मात्र केराी टोपली दाखविण्यात आली.
- सुयोग शेंडे, (निंबोली) विद्यार्थी, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, आर्वी.
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे दिवस आहे दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. पुढच्याच महिन्यात पाचवी ते नववीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा आहे. मात्र, अनेक महिन्यापासून बस गावात येत नसल्याने आम्हाला वेळेवर शाळेत जाता येत नाही. परिणामी मोठा त्रास होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा असून बस सुरू करण्याची रास्त मागणी आहे.
- साक्षी संतोष हांडे (निंबोली), विद्यार्थीनी, मॉडेल हायस्कूल देऊरवाडा