कोविड निर्मुलनासाठी ‘थ्री-टी’ संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:58+5:30
शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसुत्री संकल्पनेवर भर देऊन जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत. कोरोना काळातील पुढील धोका लक्षात घेऊन शोध, निदान आणि उपचार याला प्राधान्यक्रम दिल्या जात असल्याने लवकरच वर्धा जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
शोध, निदान आणि उपचार या संकल्पनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोना मृत्यूचा आगामी धोका टाळला जाऊ शकतो. शिवाय अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारातून परत आणण्यातही मदत मिळेल. मागील काही महिन्यांपासून थ्री टी या संकल्पनेवर काम होत असल्याने वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर कमी असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुळे पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर एकाचा इतर आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्ण मोठ्या प्रमाणात बरेही होत असल्याचे वास्तव आहे. कोविड बाधित वेळीच बरे होण्यासाठी थ्री टी ही संकल्पना सध्या उपयुक्त ठरत आहे.
१६० व्यक्तींची कोरोनावर मात
जिल्ह्यातील २१९ व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. असे असले तरी जिल्ह्याबाहेरील तसेच वर्धा जिल्ह्यातील १६० कोविड बाधितांना वेळीच आणि योग्य उपचार मिळाल्याने त्यांनी कोरोनावर मात केल्याचे वास्तव आहे. तर सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तींने कोरोनावर विजय मिळविल्यानंतर त्याचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी सात रुग्ण रविवारी आढळले सात नवीन रुग्ण
वर्धा : रविवारी २१२ व्यक्तींच्या कोविड चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सात व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये दोन देवळी तालुक्यातील तर पाच वर्धा तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.
थ्री टी संकल्पनेला शंभर पैकी शंभरच गुण देऊ
थ्री ‘टी’ संकल्पना खरोखर उपयुक्त आहे काय याबाबत अधिक माहिती कोरोनामुक्त झालेल्या आर्वीतील एका व्यक्तीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जाणून घेतली असता, ट्रेस (शोध), टेस्ट (निदान) आणि ट्रीट (उपचार) ही संकल्पना खरोखर उपयुक्त आहे. या संकल्पनेला आपण शंभरपैकी शंभर गुण देतो. शिवाय मला आरोग्य सेवाही चांगली मिळाल्याने मी कोरोनावर मात करू शकलो. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मी गृहविलगीकरणात असून लवकरच यातून माझी मुक्तता होणार असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले.
विलगीकरणाचे नियम ठरते उपयुक्त
कोरोना बाधित जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला १४ विलगीकरणात ठेवले जात आहे. तर सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून वर्धा जिल्ह्यात परतणाऱ्यांना सुरूवातीला सात दिवस संस्थात्मक तसेच नंतरचे सात दिवस गृहविलगीकरणात ठेवले जात असल्याने कोविडचा स्प्रेड टाळण्यासाठी मदत होत आहे. एकूणच जिल्हा प्रशासनाने आखून दिलेले विलगीकरणाचे नियम सध्या उपयुक्तच ठरत आहे.