लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहा दिवसांच्या कठोर लॉकडाऊननंतर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागात थोडी शिथिलता मिळाली, पण याच शिथिलतेच्या पहिल्या दिवशी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ नये, म्हणून बाजारपेठेतील रस्ते सील करण्यात आले आहेत, तर मंगळवारी पेट्रोलपंप आणि बँकांमध्ये नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली.जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशानुसार, केवळ वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना १ जूनपर्यंत घराबाहेर पडता येणार आहे, तर हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहे, पण दुकाने उघडल्यावर नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वर्धा नगरपालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बाजारपेठेतील प्रमुख रस्ते बाबू बांधून सील केले आहेत. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेतील नागरिकांची संभाव्य गर्दी टाळता आली. असे असले, तरी शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची बऱ्यापैकी वर्दळ होती.
रस्त्यावर होती वर्दळकठोर निर्बंधांमुळे तब्बल दहा दिवस निर्मनुष्य राहिलेल्या रस्त्यांवर मंगळवारी नागरिकांची वर्दळ बघावयास मिळाली. कुणी वैद्यकीय कारणासाठी तर कुणी अत्यावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते, तसेच काही विनाकारण घराबाहेर पडल्याने चित्र बघावयास मिळाले.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाला बगलविविध कामांसाठी मंगळवारी नागरिकांची बँकांसमोर गर्दी केली होती. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन झाले, तर बहुतांश ठिकाणी सामाजिक अंतराच्या नियमाला बगलच मिळाली.
बाजारपेठेत जाऊन भाजीपाला खरेदी भोवलीमंगळवारी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर शेतकऱ्यांचा भाजीपाला ठोक व्यापाऱ्यांसह किरकोळ भाजीविक्रेत्यांनी खरेदी केला, पण या ठिकाणी काही नागरिकही थेट भाजीपाला खरेदी करीत असल्याचे पुढे आल्यावर, काविड नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी भाजीपाल्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.