खत देण्यास महिला मजुरांकडून दिला जातोय नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:06+5:30
हल्ली मुले-मुली खत द्यायचे काम सांभाळत आहे. यासाठी फारच फार १०० रू. खर्च यायचा; पण आता २०० रू. प्रती बॅग मजुरी घेत असल्यामुळे खत देण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बॅग प्रमाणे मजुरी असल्यामुळे खतेही वाजवीपेक्षा जास्त लागत आहेत. कारण जास्तीत जास्त बॅग टाकायचा मजुरांचा प्रयत्न असतो. जिथे ५ बॅगचा अंदाज असला तेथे सहा ते सात बॅग लागतात. हाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : दिवसागणिक शेतीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. यातच सततची नापिकी आणि अस्मानी व सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचा पिच्छाच पुरविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जगणेच अवघड झाले आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात कपाशी पिकांची चिकणीसह परिसरातील शेतशिवारात लागवड करण्यात आली. कपाशीचे बियाणे अंकुरले असून रोपटे जमिनीच्या वर आलेत. यामुळे डवरणी सह खत देण्याच्या कामाला वेग दिला जात आहे.
शुक्रवारी व मंगळवारला चिकणीसह पढेगाव, जामणी, निमगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकरी कपाशी पिकाला खत द्यायच्या कामाला गती देत आहेत. मात्र, महिला मजूर खत द्यायच्या कामाला नकार देत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
हल्ली मुले-मुली खत द्यायचे काम सांभाळत आहे. यासाठी फारच फार १०० रू. खर्च यायचा; पण आता २०० रू. प्रती बॅग मजुरी घेत असल्यामुळे खत देण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर बॅग प्रमाणे मजुरी असल्यामुळे खतेही वाजवीपेक्षा जास्त लागत आहेत. कारण जास्तीत जास्त बॅग टाकायचा मजुरांचा प्रयत्न असतो. जिथे ५ बॅगचा अंदाज असला तेथे सहा ते सात बॅग लागतात. हाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
खत द्यायच्या कामाला महिला मजूर नकार देत असल्यामुळे ना इलाजास्तव मुलांना बॅग प्रमाणे खत द्यायला सांगावे लागते. विशेष म्हणजे शेतीच्या कामात वेळेला फार महत्व असते. वेळेचे काम वेळीच करावे लागते. तरच शेतीत उत्पन्न होण्याची शक्यता असते.
- अतुल घोडे, युवा शेतकरी, चिकणी.
शेतीची कामे आली ठेकापद्धतीवर
पुर्वी शेतीची सर्रास कामे ही रोजनदारीनेच केल्या जायची. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असायचा. पण गेल्या चार-पाच वर्षामध्ये शेतीकामे ही घडाळीच्या तासाप्रमाणे झाले आहेत. तर काही कामे ठेक्याप्रमाणे. खत देणे बॅग प्रमाणे, औषध फवारणी पंपा प्रमाणे, तर निंदन तासाप्रमाणे, निंदन करणाऱ्या मजुरांचे तास या प्रमाणे असतात. सकाळी ७ ते ९, ८ ते ९, १० ते ३, ११ ते ५ असे ठरले असते.