लॉकडाऊनने हिरावला लघुव्यावसायिकांचा घास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत सारे काही ठप्प पडले होते. जून महिन्यात शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरी अद्याप मध्यम आणि लघु व्यावसायिकांची आर्थिक घडी पूर्व पदावर आलेली नाही.
मागील पाच महिन्यांपासून कलावंत, ऑटो व इतर प्रकारच्या व्यावसायिकांचे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनने अर्थकारण कोलमडल्याने कंबरडेच मोडले आहे. सर्वच प्रकारच्या लघु व्यावसायिकांतून शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी होत आहे. ‘लोकमत’ने विविध व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांचा घेतलेला हा मागोवा.
ऑटोचालकांची आर्थिक घडी विस्कटली
सेलू : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ ऑटोची चाके थांबली. कुटुंबाचे भरणपोषण कसे करावे, हा प्रश्न होता. काही जण समृद्धी महामार्गाच्या कामावर काही जणांनी शेतमजुरी सुरू केली. मात्र ज्यांच्या हाताला कामच मिळाले नाही, त्यांच्या परिवाराचे हाल झाले. आता ऑटो सुरू आहे. मात्र, प्रवासी अत्यंत कमी मिळतात. कधी दोन-तिनशे तर कधी पाच-पन्नासवर समाधान मानावे लागते, अशी भावना ऑटोचालकांनी व्यक्त केली. सेलू-वर्धा, सेलू-वडगाव-झडशी, सेलू-हिंगणी, सेलू-केळझर अशा विविध मार्गावरून सेलू या मुख्य शहरातून ऑटोचा प्रवास प्रवाशांना सोयीचा होता. कोरोना प्रतिबंधक उपाय करताना ऑटो बंद करण्यात आले. सुमारे तीन महिने ऑटो बंद राहिल्याने ऑटोचालकांचे कंबरडेच मोडले.
ऑटोचालक संजय मधुकर सोरते म्हणाला, पत्नी, मुलगा व मुलीसह राहतो. ऑटोव्यवसायावरच उपजीविका चालायची. दररोज येणाºया चार-पाचशे रुपयांतून खर्च काढून रोजीरोटी वाचायची. लॉकडाऊनमध्ये तीन महिने ऑटो बंद होता. उत्पन्नाचा स्रोतच बंद झाल्याने कुटुंबीयांना हाल सोसावे लागले, हे शब्दात सांगताना डोळ्यात पाणी येते, असे तो म्हणाला. प्रशांत गोविंद लटारे म्हणाला, अनेक ऑटोचालकाची परिस्थिती बिकट आहे. दररोजच्या धंद्यातून जे वाचेल, त्या पैशावर घर चालायचे, ऑटोमुळे आधार होता. लॉकडाऊनमधील तीन महिने संकटांचा सामना करावा लागला. कोरडं-ओल खाऊन दिवस काढले. तेला मिठाचीही सोय नव्हती, आता ऑटो सुरू झाला, मात्र, प्रवासी नाहीत. तुटपुंज्या मिळकतीवर कुटुंबाचे पोट भरणे सुरू आहे. शशिकांत जर्नादन सावरकर म्हणाला, लॉकडाऊनमध्ये ऑटो बंद झाले. याच काळात विवाह झाला. अत्यंत कठीण परिस्थिती अनुभवली आता चार पैसे येतात. दिवस काढणे सुरू आहे. सरकारने ऑटोचालकांना मासिक पाच हजार रुपये मानधन द्यावे, अशी अपेक्षा आहे.