दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड झालीय बेलगाम

By Admin | Updated: February 11, 2015 01:40 IST2015-02-11T01:40:23+5:302015-02-11T01:40:23+5:30

वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या गरजा अमर्याद असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शासकीय संपत्ती असलेल्या जंगलात खुलेआम वृक्षतोड सुरू आहे.

Illegal tree plantation due to ignorance | दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड झालीय बेलगाम

दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड झालीय बेलगाम

अमोल सोटे आष्टी (शहीद)
वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या गरजा अमर्याद असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शासकीय संपत्ती असलेल्या जंगलात खुलेआम वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारीच प्रोत्साहीत करीत असल्याची ओरड होत आहे़
वर्धा जिल्ह्यात उपलब्ध एकूण वनापैकी ६५ टक्के वन आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात आहे. या जंगलांत साग, खैर यासह विविध प्रजातीचे वृक्ष आहेत़ मौल्यवान वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी वनसंरक्षण समित्या, वनविभागाकडे आहे; पण त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत असल्याचे दिसते़ नदीकाठावरील मोठी झाडे दिवसाढवळ्या तोडली जात आहेत़ बाभुळ, आंबा, निंब या झाडांचीही कत्तल होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर असलेली झाडे कमी पैशात विकत घेऊन परिसरातील झाडे तोडली जात आहे. झाडांच्या कत्तलीमुळे प्रदूषण होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे़ हे नुकसान कसे भरून निघेल, हा प्रश्नच आहे़ जंगलात प्राण्यांची सुरक्षितता राहिली नाही. यामुळे अनेक प्राण्यांचा बळी जात आहे.
आष्टी वनपरिक्षेत्रात एकूण पाच वाघ आहेत़ यात दोन मोठे तर तीन बिबट आहेत़ या पाचही वाघांना सुरक्षितता नसल्याने ते शिकाऱ्यांच्या रडारवर आहे. जंगलाशेजारील भागात तारांचे कुंपण लावून वीज खांबावरून वीज प्रवाह देऊन त्यात प्राणी अडकून मरतात. मृत प्राण्यांचे मांस विकले जाते़ प्राण्यांवर प्रेम करण्याऐवजी त्यांची शिकार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. रोही, हरीण, ससा, मोर या प्राण्यांची शिकार केली जात आहे. प्राणी गणनेनंतर सुरक्षा वाढविण्यासाठी वनविभागाचा कल दिसत नाही. आष्टी-थार-पार्डी रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. यात सुरक्षित वन असून वनविभागाने तारेचे कुंपण करणे गरजेचे आहे़

Web Title: Illegal tree plantation due to ignorance