आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:35 IST2026-04-25T10:34:27+5:302026-04-25T10:35:24+5:30
बुलढाण्याचे शिंदेसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या अर्धांगिनी एका कार्यक्रमात जातात काय, तिथे त्यांना पुस्तक भेट म्हणून मिळते काय, त्या ते आमदारांना देतात काय आणि केवळ शीर्षकच वाचून आमदार पुस्तकाच्या प्रकाशकाला अवेळी फोन करून शिव्यांचा भडिमार करतात काय! सारेच अतर्क्य! त्यासाठी कारणीभूत ठरले, दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक!

आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
बुलढाण्याचे शिंदेसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्या अर्धांगिनी एका कार्यक्रमात जातात काय, तिथे त्यांना पुस्तक भेट म्हणून मिळते काय, त्या ते आमदारांना देतात काय आणि केवळ शीर्षकच वाचून आमदार पुस्तकाच्या प्रकाशकाला अवेळी फोन करून शिव्यांचा भडिमार करतात काय! सारेच अतर्क्य! त्यासाठी कारणीभूत ठरले, दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक! ते एप्रिल १९८८ मध्ये प्रकाशित झाले आणि आजही वाचले जाते. लाखो वाचकांनी ते हृदयाशी जपले आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा तो एक मानबिंदू आहे; परंतु तब्बल ३८ वर्षांनी त्या पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याचा शोध संजय गायकवाड यांना लागला! त्यांनी नेमक्या जागतिक पुस्तकदिनीच, ‘पानसरेंचं काय झालं माहीत आहे ना? घरात घुसून मारीन!’ असे पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावले.
विवेक आणि तर्काचे प्रतीक असलेल्या पानसरेंची २०१५ मध्ये दुर्दैवी हत्या झाली होती. अशा विचारवंताचे नाव आता एक नववी उत्तीर्ण आमदार दहशतीचे हत्यार म्हणून वापरतो, हे महाराष्ट्राचे दुर्दैव! आंबी यांनी गायकवाडांना समजावले, की पुस्तक त्यांनी लिहिलेले नाही आणि त्यामध्ये शिवरायांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी गायकवाडांना आधी पुस्तक वाचण्याचा सल्लाही दिला. तब्बल नऊ मिनिटे त्यांनी संयमाने, शांतपणे उत्तरे दिली. घाबरून न जाता ठाम भूमिका घेतली आणि ‘उद्या या आणि माझी जीभ कापा’ असे खणखणीत उत्तरही दिले. एका बाजूला असे धाडसी प्रकाशक आणि दुसऱ्या बाजूला असे लोकप्रतिनिधी! खऱ्या शिवभक्ताचे लक्षण कोणात दिसते, हे महाराष्ट्राने ठरवावे! गायकवाडांनी स्वतःच कबूल केले, की त्यांनी पुस्तक वाचलेले नाही. शीर्षकात ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख आहे म्हणून त्यांनी आकाशपाताळ एक केले; परंतु त्यांना कोणीतरी सांगायला हवे, की पूर्वी आपुलकीच्या भावनेने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख सर्रास केला जात असे. त्यात अनादर नसे, तर जिव्हाळा आणि आपुलकी असे! पानसरेंनी ते पुस्तक तेव्हाच्या प्रचलित भाषेत लिहिले आणि त्यात शिवरायांच्या लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, धर्मनिरपेक्ष, न्यायी राज्याची प्रशंसाच केली आहे.
शिवरायांनी शत्रूच्या स्त्रियांनाही साडी-चोळी देऊन सन्मानाने पाठवले. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या स्वकीयांना कडेलोटाच्या, चौरंगा करण्याच्या शिक्षा दिल्या. अशा शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या गायकवाडांनी प्रकाशकाच्या आई-पत्नीसंदर्भात अत्यंत अभद्र, घाणेरडी भाषा वापरली. तब्बल नऊ मिनिटे ते प्रकाशकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते. आईवरून शिव्या देणाऱ्यांनी किमान शिवरायांचा उल्लेख तरी करू नये; कारण तसा उल्लेखच शिवरायांचा खरा अपमान आहे! गायकवाडांचे अशा प्रकारचे हे एकमेव प्रकरण नाही. त्यांनी राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आपण वाघाची शिकार केली आणि त्याचे दात गळ्यात मिरवतो, अशी फुशारकी त्यांनी एकदा मारली होती; पण तपासात तो दात प्लास्टिकचा असल्याचे सिद्ध झाले होते. पोलिस खात्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईच्या आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला जेवणाच्या तक्रारीवरून बेदम मारहाण केली होती. गेल्याच वर्षी त्यांनी मतदारांची तुलना वेश्यांशी केली होती, तर एका पोलिस कर्मचाऱ्याला त्यांची गाडी धुवायला लावली होती! वाद आणि दहशत हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. आंबी यांनी गायकवाडांविरोधात तक्रार दाखल केली आहे; पण सत्ताधारी पक्षाच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे धाडस कोल्हापूर पोलिस दाखवतील का? त्यांनी न दाखवल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलिसांना निर्देश देतील का? गायकवाड आंबी यांना थेट ‘पानसरेंजवळ जा’ म्हणून सांगतात, ही सरळसरळ खुनाची धमकी आहे. केवळ त्यांच्याशी सहमत नसल्याचे सांगून, गायकवाडांच्या नेत्यांना सुटका करून घेता येणार नाही. वाचन संस्कृतीचा गंध नसलेले, इतिहास न जाणणारे, शिवीगाळीलाच भाषेचा सोहळा समजणारे, गायकवाड एकटे नाहीत. असे बरेच आहेत. शिवरायांनी स्वराज्याचा पाया रचला, तो स्वत:साठी नव्हे, तर रयतेसाठी! आता त्याच भूमीत, हप्तावसुली करत जनतेला लुटणारेही आमदार म्हणून विधिमंडळात बसतात! दुर्दैवाने जनताच अशांना तिथे पाठवते! शिवरायांनी न्यायाचे राज्य निर्माण केले होते, दहशतीचे नव्हे, हे त्यांचा वारसा सांगणाऱ्या गायकवाडांसारख्यांना ज्या दिवशी कळेल, तो महाराष्ट्रासाठी सुदिन असेल!