लग्नावरून परतताना काळाचा घाला, अपघातात पती-पत्नी ठार; हिंगणघाटच्या रुग्णालयाजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:43 IST2026-05-15T12:41:19+5:302026-05-15T12:43:20+5:30
Vardha : लग्न आटोपून रात्री दुचाकीने गावाकडे परत येत असताना दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात पती आणि पत्नी जागीच ठार झाले, तर त्यांची अवघ्या चार वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली.

Husband and wife killed in accident while returning from wedding; Incident near Hinganghat hospital
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट (वर्धा): लग्न आटोपून रात्री दुचाकीने गावाकडे परत येत असताना दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात पती आणि पत्नी जागीच ठार झाले, तर त्यांची अवघ्या चार वर्षाची चिमुरडी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास येथील कुटीर रुग्णालयाजवळ घडली.
यादवराव बापूराव सलाम (३५) आणि विद्या यादवराव सलाम (२७) असे अपघातात ठार झालेल्या पती आणि पत्नीचे नाव आहे. पूर्वा यादवराव सलाम (४), असे गंभीर जखमी चिमुरडीचे नाव आहे. ती आता पोरकी झाली आहे. बुधवार, १३ मे रोजी सकाळी येथील इंदिरा गांधी वॉर्डातील रहिवासी असलेले यादवराव सलाम पत्नी व मुलीसह आपल्या स्कूटीने (क्र.एमएच ३२/एडब्ल्यू २२६५) वरोरा येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. वरोऱ्याहून हिंगणघाटला येत असताना येथील कुटीर रुग्णालयाजवळून शिवाजी मार्केटकडील मार्गाकडे वळण्याकरिता त्यांनी दुचाकी पुलावर चढविली. त्याचवेळी नागपूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. एचआर ४७/एच ४७२६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पती-पत्नीचा ट्रकच्या मागील चाकात येऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलगी पूर्वा दूर फेकली गेली. तिला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. पोलिसांना माहिती देण्यात आली. गंभीर जखमी असलेल्या पूर्वाला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त ट्रक जागीच उभा करून चालक फरार झाला.
वाहतूक पोलिसही नाही अन् गतिरोधकही नाही
- मागील काही दिवसांपासून येथील कलोडे चौक ते कुटीर रुग्णालयापर्यंत पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. परिसरात कुटीर रुग्णालय आहे.
- मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. त्यामुळे नेहमी या परिसरात वाहतुकीची वर्दळ असते. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी दोन्ही चौकात वाहतूक पोलिस नसतात.
- येथे गतिरोधकही नाही. त्यामुळे अपघात होत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सलाम कुटुंब अपघाताचे बळी ठरल्याची चर्चा आहे.