रात्री नऊनंतर फिरणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:23+5:30
जिल्ह्यातील दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८८७ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ व इतर संबंधित कायदे आणि नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यानी सांगितले आहे. त्यामुळे नियम पाळणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत लागू राहणार असून जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी ३१ जुलैपर्यंत कलम १४४ लागू केली आहे. जिल्ह्यातील दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच रात्री नऊ ते सकाळी पाचपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता कुणी घराबाहेर पडल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात काही बाबी वगळता सर्वच व्यवहार पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहेत. मात्र, काही बाबींवर अजूनही निर्बंध आहेत. सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि मास्कचा वापर करणे प्रत्येक व्यक्तीला बंधनकारक राहील.
जिल्ह्यातील दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८८७ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ व इतर संबंधित कायदे आणि नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यानी सांगितले आहे. त्यामुळे नियम पाळणे गरजेचे आहे.
ही प्रतिष्ठाने राहतील बंद
सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण व कोचिंग संस्था पूर्णत: बंद राहतील. परंतु आॅनलाईन दुरस्थ पद्धतीने अभ्यासक्रम सुरू ठेवता येईल. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, सभागृह आणि असेंब्ली हॉल इत्यादी ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिककार्य, इतर मेळावे घेण्यास बंदी राहील. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट, यामधील डायनिंग सुविधा बंद राहील. तंबाखू, पान, चहाची टपरी पुढील आदेशापर्यंत बंद राहील. सर्व धार्मिक स्थळे, पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येतील. या बाबींव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, व्यवसाय उद्योग सुरु राहतील. मात्र, कोरोनासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तेथे काटेकोरपणे अंमलबजावणी होणे क्रमप्राप्त राहणार आहे.