वर्धा: महाराष्ट्र शासनाच्या एमएसबीटीई अभ्यासक्रमातील एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., व्हि.जे.एन.टी. तसेच अपंग विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनेचा बनावट दस्ताऐवजा आधारे जिल्ह्यातील तथा कथित शिक्षण माफियांनी ६६ कोटी २६ लाख ६६ हजार ३५८ रुपयांचा अपहार केला. जिल्ह्यातील शंभरावर एमएसबीटीई अभ्यासक्रम चालविणाऱ्या शिक्षण माफियांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची व संपत्तीची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. भास्कर इथापे यांनी एका निवेदनामार्फत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. सदर प्रकरणाची शासनाने सीबीआयमार्फत चौकशी करण्यास टाळाटाळ केल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचे प्रा. इथापे यावेळी म्हणाले. २००१ ते २०१० तसेच २०१० व ११, १२ या सत्रवत बनावट दस्ताऐवजाच्या आधारे शिष्यवृत्तीची उचल केल्याचे महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात नमूद आहे. जिल्ह्यातील शंभरावर संस्था चालकांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयाचा चूना लावला. या बाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविल्याने त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी केली. समितीने चौकशी अहवाल सामाजिक न्याय विभागाकडे सादर करून सहा महिने लोटले तरीही जिल्ह्यातील शिक्षण माफियांच्या विरूद्ध कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप इथापे यांनी केला. शैक्षणिक क्षेत्रात नामवंत म्हणून शेखी मिळविणाऱ्या शिक्षण संस्थाधिशांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवत सदर रक्कम वसूल पात्र रक्कम म्हणून अहवालात नोंदविली असली तरीही तिच्या वसुलीची कुठलीही चिन्हे नाहीत.(कार्यालय प्रतिनिधी)
कोट्यवधींच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा
By admin | Published: August 24, 2014 12:09 AM