भाजपाने जनतेचा विश्वासघात केला, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 14:31 IST2017-12-05T12:53:42+5:302017-12-05T14:31:42+5:30
विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच. शिवाय शेतकरी राजालाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वर्ध्यातील सेलसुरा येथील सभेदरम्यान केला.

भाजपाने जनतेचा विश्वासघात केला, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
वर्धा - विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच. शिवाय शेतकरी राजालाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वर्ध्यातील सेलसुरा येथील सभेदरम्यान केला. विदर्भामध्ये पदयात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही. सगळ्याच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही. सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सुरेखा ठाकरे आदींसह स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी यात्रेचा पाचवा दिवस. या दिवशी एकूण 14 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी यात्रा वर्धा येथे जाणार आहे. हल्लाबोल मोर्चाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात देवली येथून झाली. एका जिनिंगमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतक-यांशी संवाद साधला. सरकारची कापूस खरेदी केंद्र आणखी सुरू झाली नसल्याने बेभावाने व्यापा-यांना कापूस विकावा लागत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी यावेळी केल्या.