विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 22:31 IST2025-08-28T22:29:11+5:302025-08-28T22:31:00+5:30
Yogi Adityanath Latest Speech: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसला लक्ष्य केले. या पक्षांनी समृद्ध उत्तर प्रदेशचे कुपोषण करून ओळख मिटवली, अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला.

विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
CM Yogi Adityanath latest News: 'उत्तर प्रदेश कुपोषित आणि आजारी राज्य नव्हते. विश्वासघातकी राजकीय पक्षांनी या राज्याला आजारी बनवले. भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या राजकारणाने या समृद्ध प्रदेशाला मागासलेपणाच्या गर्तेत ढकलले. ओळख मिटवली. २०१७ पूर्वी नियुक्त्या करताना भेदभाव केला जात होता. पात्र असलेले तरुण अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी ठरत होते', अशा शब्दात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर घणाघात केला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लोकभवन सभागृहात उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगातर्फे निवडण्यात आलेल्या २,४२५ मुख्य सेविका आणि १३ फार्मासिस्ट उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
उत्तर प्रदेशचे देशाच्या विकासात १४ योगदान होते, पण...
मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, 'देशाच्या विकासात उत्तर प्रदेशचे मोठे योगदान होते. १९४७ नंतर १९६० पर्यंत उत्तर प्रदेश देशातील अग्रगणी राज्य होते. देशाच्या विकासात १४ टक्के योगदान होते. १९६० नंतर उत्तर प्रदेशची घसरण सुरू झाली. १९९० नंतर घसरगुंडीच झाली. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे देशाच्या विकासातील योगदान अवघ्या ८ टक्क्यांवर आले होते.'
'कृषि उत्पादन, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीमध्ये उत्तर प्रदेश कायम पिछाडीवर पडत गेला. उत्तर प्रदेशातील तरुण मग बाहेरच्या राज्यात जात होते. तिथेही त्यांच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. हे सगळं घराणेशाही आणि दंगलीच्या राजकारणामुळे घडत होतं. या राजकारणाने उत्तर प्रदेशला लुटीचा अड्डाच बनवलं होतं', अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस, समाजवादी पक्षावर केली.
विरोधकांना नैराश्याने ग्रासले, मुद्दे राहिले नाहीत
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'विरोधकांकडे आता कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यांना नैराश्य आले आहे. मोडकळीस आलेल्या इमारतींतून कार्यालये हलवणे आणि विद्यार्थी आणि शिक्षकांची कमी झालेली संख्या वाढवणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा भाग आहे.'
'एक मोडकळीस आलेली इमारत कोसळून मुले मेली. पण, विरोधक दिशाभूल करत आहे. सरकार प्री-प्रायमरी आणि ५००० अंगणवाड्याही चालवत आहे. मुलांचं चांगलं पोषण व्हावं म्हणून पोषण मिशनच्या अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील मुलाचे मानसिक आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून सरकार प्रयत्न करत आहे', असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.