लखनौ - उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात धानेपूर परिक्षेत्रात बुधवारी सकाळी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरील लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर दोघांना रुग्णालयात नेत असताना त्यांनी जीव सोडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून कार व बाईक जप्त करण्यात आली आहे.
मोतीगंज ठाणे क्षेत्रातील कोल्हुआ बनकटा गावचा रहिवाशी असलेला नीरज रविवारी सकाळी औषधे आणण्यासाठी बाईकवरुन जात होता. नीरजमसवेत मुजेहना गावातील रहिवाशी असलेले त्याचे काका (४५) व त्यांचा नातू अक्षय उर्फ गुड्डू (९) हेही बाईकवर बसलेले होते. गोंडा-उतरौला मार्गावर सोहिला झीलजवळ हे तिघे पोहोचले असता समोरुन वेगात येणाऱ्या कारने त्याच्या बाईकला जोराची धडक दिली. या अपघातात बाईकवरील तिघेही उडून दूरवर पडले.
या दुर्घनटेत बाईकवरील लहान मुलगा अक्षय उर्फ गुड्डूचा जागीच मृत्यू झाला. तर, नीरज आणि मिश्रिलाल गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी, नीरज आणि मिश्रिलाल यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. त्यामुळे, त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राथमिक माहितीच्या आधारे पोलीस डायरीत नोंद करण्यात आली आहे.