Unseasonal rains : शिरूर तालुक्यात गारपिटीचा तडाखा; ११९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २०४५ शेतकरी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 10:42 IST2026-04-04T10:41:31+5:302026-04-04T10:42:33+5:30
- कांदा, गहू, डाळिंबासह विविध पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे सुरू, तातडीने भरपाईची मागणी

Unseasonal rains : शिरूर तालुक्यात गारपिटीचा तडाखा; ११९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, २०४५ शेतकरी बाधित
शिरूर : शिरूर तालुक्यात १ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून तब्बल ११९५.८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे २०४५ शेतकरी संकटात सापडले असून तालुक्यातील १६ गावांना फटका बसल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुवर्णा कटके-आदक यांनी दिली.
पूर्व व बेट भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा, बटाटा, गहू, मका, कलिंगड, डाळिंब, केळी, पपई, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने सडण्याची भीती निर्माण झाली आहे, तर काढणीला आलेला गहू व वादळामुळे अनेक ठिकाणी भुईसपाट झाला आहे. गारपिटीमुळे ऊसही आडवा पडला असून आंब्याच्या कैऱ्या व कच्चे डाळिंब गळून पडले आहेत.
कोळगाव डोळस, निर्वी, आंधळगाव, न्हावरे, गुणाट, चव्हाणवाडी, कोहकडेवाडी, शिंदोडी, नागरगाव, कुरूळी, पिंपरखेड, जांबूत, केंदूर, पाबळ, करंदी, खैरेनगर, कान्हूर मेसाई आदी गावांना या आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, सर्वाधिक नुकसान झालेल्या निर्वी परिसराची पाहणी माजी आमदार अशोक पवार यांनी केली. शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडे नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार नुकसान मोठ्या प्रमाणात असून अंतिम पंचनाम्यानंतर आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून जोर धरत आहे.