ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:44 IST2025-06-24T13:42:40+5:302025-06-24T13:44:13+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने मुंब्रा-शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शीळ येथील १७ बेकायदा इमारतींवर १३ जूनपासून सलग चार दिवस कारवाई करण्यात आली.

ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
ठाणे : न्यायालयीन स्थगितीची मुदत संपल्यानंतर ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक सोमवारी पुन्हा मुंब्रा-शीळ भागातील उर्वरित पाच इमारती पाडण्यासाठी पोहोचले असता त्याला इमारतींमधील रहिवाशांनी विरोध केला. या रहिवाशांनी नऊ तास पालिकेच्या पथकाला अडवून ठेवले. अखेर सायंकाळी ४ नंतर पोलिसांनी रहिवाशांना हटवले आणि दोन इमारती तोडण्यात आल्या, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने मुंब्रा-शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शीळ येथील १७ बेकायदा इमारतींवर १३ जूनपासून सलग चार दिवस कारवाई करण्यात आली. त्यात १२ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यानंतर ४ इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने कारवाईला स्थगिती न देता रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी २३ जूनपर्यंत मुदत दिली होती.
ती सोमवारी संपताच ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पोलिस ताफ्यासह खान कंपाउंडमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचले. परंतु कारवाई होणार याची कल्पना आधीच रहिवाशांना असल्याने त्यांनी सकाळी ७ पासूनच येथे धरणे आंदोलन सुरू केले होते. महिला रहिवाशांना पुढे करत पालिकेच्या पथकाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप पालिकेने केला.
रहिवासी म्हणतात, आमची काय चूक ?
आम्ही अनेक महिन्यांपासून या इमारतींमध्ये राहत आहोत. आम्हाला नोटीस न देता पालिकेने कारवाई केली. इमारत बेकायदा होती, तर आम्हाला वीजजोडणी का दिली. इमारती बेकायदा आहेत, यात आमची काय चूक, अशी कैफियत रहिवाशांनी मांडली. पालिका अधिकारी आणि पोलिस यांनी रहिवाशांची समजूत काढता काढता सायंकाळचे ४ वाजले.
अजूनही चार इमारती शिल्लक
१८ बेकायदा इमारतींपैकी सोमवारपर्यंत १४ इमारती पाडण्यात आल्या. उर्वरित ४ इमारतींमध्ये ७५ कुटुंबांचे वास्तव्य असून रहिवाशांची संख्या २००च्या आसपास असल्याची माहिती उपायुक्त पाटोळे यांनी दिली. रहिवाशांची समजूत काढून पुन्हा मंगळवारपासून कारवाई सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साडेपाच एकरांवर या इमारती बांधण्यात आल्या आहेत.