एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 05:53 IST2026-05-07T05:51:19+5:302026-05-07T05:53:18+5:30
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक सातत्याने बरे झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण प्रतिसाद मिळत नाही.

एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
प्रज्ञा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘‘एकदा घरी फोन करा ना... आई आमचा आवाज ऐकून नक्की येईल’’, ‘‘भावाला सांगा मला न्यायला...’’ या निरागस आणि आर्त हाका आहेत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील अशा व्यक्तींच्या, ज्या उपचारानंतरबऱ्या झाल्या आहेत. मात्र, आजारपणातून मुक्त होऊनही ही मंडळी अद्याप रुग्णालयाच्या चार भिंतींतच अडकून पडली आहेत, कारण त्यांच्या हक्काच्या माणसांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
भोळी आशा हे रुग्ण भोळ्या
आशेवर जगत आहेत. आज नाही तर उद्या आपली माणसे येतील, आपल्याला मिठी मारतील आणि घरी घेऊन जातील. पण, वास्तव मात्र वेगळेच आहे. रुग्णालयाकडून वारंवार प्रयत्न करूनही अनेक नातेवाईक संपर्कात येत नाहीत, काही जण टाळाटाळ करतात, तर काही फोनलाही प्रतिसाद देत नाहीत.
संपर्क साधूनही दुर्लक्ष
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक सातत्याने बरे झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण प्रतिसाद मिळत नाही.
अशा आहेत हृदयद्रावक कहाण्या...
लीना (४०, नाव बदलले आहे): गेल्या वर्षभरापासून आईच्या आठवणीत व्याकूळ आहे. आईच्या हातचे जेवण जेवायचे आहे, असे म्हणताना तिचे डोळे पाणावतात. जून २०२५ पासून तिच्या नातेवाइकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप कोणीही प्रतिसाद दिलेला नाही.
राजेश्री (४८, नाव बदलले आहे): उच्चशिक्षित असलेली राजेश्री ‘अनोळखी रुग्ण’ म्हणून दाखल झाली होती. आता ती पूर्णपणे बरी असून तिला घरी जायचे आहे. शॉर्टसर्किटमुळे तिचे घर जळाले असून आई आणि भाऊ वेगळे राहतात. मी एकटी राहायला तयार आहे, असे ती सांगते, मात्र तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.
लक्ष्मी (५१, नाव बदलले आहे): डिसेंबर २०२४ मध्ये दाखल झालेली लक्ष्मी उपचारानंतर घरी जाण्यास सज्ज आहे. मात्र, तिचे नातेवाईक आजतागायत तिला भेटायलाही आलेले नाहीत.
रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी
आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी किमान एकदा भेट द्यावी, ही अपेक्षा आहे. समाज आणि सामाजिक संस्थांनीही पुढे येण्याची गरज आहे.
डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक