विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग स्वागतार्ह : न्या. शर्मिला देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 00:36 IST2026-04-27T00:35:21+5:302026-04-27T00:36:29+5:30
टीएमसी विधी महाविद्यालयाचा विधी पदवी प्रदान सोहळा उत्साहात

विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग स्वागतार्ह : न्या. शर्मिला देशमुख
ठाणे : आजच्या काळात महिलांकडे नेतृत्वगुण, विश्लेषण क्षमता आणि संवेदनशीलता आहे. त्यामुळे त्या न्यायव्यवस्थेत प्रभावी भूमिका बजावू शकतात. वकिली व्यवसायात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. त्यातही संधी शोधाव्यात. महिलांच्या विधी क्षेत्रातील वाढत्या सहभागाचे स्वागत करत, अधिकाधिक महिला वकिलांनी न्यायव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी व्यक्त केली.
विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५१ व्या बॅचचा विधी पदवी प्रदान सोहळा पाणिनी सभागृहात शनिवारी झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रीविद्या जयाकुमार यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. प्रमुख अतिथी म्हणून न्या. देशमुख आणि ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. बी. अग्रवाल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते १५० विद्यार्थ्यांना विधि पदव्या प्रदान करण्यात आल्या. न्या. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक आयुष्यात प्रामाणिकपणा, संयम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सल्ला दिला. वकिली हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे माध्यम आहे. त्यामुळे शॉर्टकट टाळून परिश्रम, नैतिकता आणि कायद्याचे भान ठेवून काम केल्यासच दीर्घकालीन यश मिळते, असे त्यांनी नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, सुधारक आगरकर, रविंद्र रसाळ आणि दिलीप जोशी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. बेडेकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ व्यावसायिक प्रगतीच नव्हे तर समाजाप्रती जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. कृष्णा कामथ यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद वाघ यांनी केले.