सहर शेख यांच्या वक्तव्यावर वाद; किरीट सोमय्यांची पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:44 IST2026-01-22T15:43:02+5:302026-01-22T15:44:16+5:30
किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये सहर शेख यांनी भविष्यात वृक्षलागवड करून मुंब्रा हिरवे करण्याचे विधान केल्याचा उल्लेख आहे.

सहर शेख यांच्या वक्तव्यावर वाद; किरीट सोमय्यांची पोलिसांकडे तक्रार
ठाणे : मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. या विधानाच्या निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली.
यावेळी किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत औपचारिक तक्रार नोंदवली. पोलिस प्रशासनाने यापूर्वीच सहर शेख यांना नोटीस बजावून समज दिली असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ही कारवाई अपुरी असून ती मान्य नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये सहर शेख यांनी भविष्यात वृक्षलागवड करून मुंब्रा हिरवे करण्याचे विधान केल्याचा उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष भाषणात कुठेही वृक्ष किंवा झाडे लावण्याचा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला. उलट, भाषणादरम्यान मुंब्रा येथील २० टक्के हिंदू बांधवांविरोधात धमकीची भाषा वापरण्यात आली असून, “त्यांना संपवण्यासारखे” गंभीर वक्तव्य केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, असे सांगत सहर शेख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणामुळे ठाणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.