सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:55 IST2026-05-16T13:54:05+5:302026-05-16T13:55:21+5:30
समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्षे नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी भरडले जात आहेत.

सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
ठाणे : मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्षे नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी भरडले जात आहेत. प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी खा. नरेश म्हस्के यांनी दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवत शुक्रवारी नवी मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात बैठक घेतली. त्यात सकारात्मक चर्चा होऊन ६ महिन्यांत सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्ये रेल्वेकडे हस्तांतरण करणे, पावसाळापूर्व व दैनंदिन कामे करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखकर होणार आहे.
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकांमध्ये म्हस्के यांनी हा विषय मांडला. वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार २००३ आणि २००८ मध्ये संपले आहेत. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी एकही देखभाल करार झालेला नाही.
खा. नरेश म्हस्के यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले होते. बैठकीला सिडकोच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी आणि इतर अधिकारी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथूर, मुख्य अभियंता नवीन पाटील यांच्यासह शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, नगरसेवक अनिकेत म्हात्रे उपस्थित होते.
बंद तिकीट बुकिंग खिडक्या उघडा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हायवेचे ६- लेनिंग आणि विविध प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा विकास होत आहे. त्यातून विद्यमान रेल्वे पायाभूत सुविधांवर ताण येणार आहे. त्यामुळे तातडीने सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके (मानखुर्द-बेलापूर, ठाणे-तुर्भे-वाशी-नेरुळ, नेरुळ-उरण मार्ग) अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी, देखभाल आणि दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, बंद तिकीट बुकिंग खिडक्या उघडाव्यात तसेच रबाळे, दिघा, ऐरोली स्थानक परिसरातील भुयारी मार्ग, फूट ओव्हर ब्रिजचे काम सुरू करावे, अशा सूचना त्यांनी बैठकीत केली.