दहिसर टोलनाका हटवण्याच्या शिंदेसेनेच्या प्रयत्नांना भाजपाकडून ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:47 IST2025-11-16T15:47:05+5:302025-11-16T15:47:56+5:30
दहिसरचा टोलनाका हा स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी वनमंत्री गणेश नाईक सह भाजपाच्या विरोध नंतर दहिसर टोलनाका अन्यत्र हलवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे.

दहिसर टोलनाका हटवण्याच्या शिंदेसेनेच्या प्रयत्नांना भाजपाकडून ब्रेक
मीरारोड- दहिसरचा टोलनाका हा स्थलांतर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी वनमंत्री गणेश नाईक सह भाजपाच्या विरोध नंतर दहिसर टोलनाका अन्यत्र हलवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील वरसावे खाडी पुला पलीकडे नायगाव हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर टोलनाका संयुक्तिक नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाने दहिसर टोलनाका हटवण्या वरून शिंदेसेना आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कोंडी करून धक्का दिल्याचे मानले जात आहे.
दहिसर येथील टोलनाकामुळे गेली अनेक वर्ष वाहतूक कोंडीचा सामना मीरा भाईंदर सह वसई विरार व अन्य भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा टोलनाका हटवण्याच्या मागण्या आणि आश्वासने अनेक राजकीय पक्ष व नेत्यांनी दिली. आंदोलने झाली मात्र टोलनाका काही हटला नाही. परिवहन मंत्री झाल्यावर सरनाईक यांनी टोलनाका विरुद्ध आक्रमक पवित्रा घेत टोलनाका हटवणारच असे सातत्याने जाहीर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे बैठक घेऊन टोलनाका अन्यत्र हलवण्याचा निर्णय पण झाला.
सुरुवातीला टोलनाका वरसावे महामार्गावर स्थलांतराचा विषय झाला व नंतर वरसावे खाडी पूल पलीकडे नायगाव हद्दीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर नेण्याबाबत चर्चा झाली. मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह येथे पाहणी देखील केली. मात्र भाजपाचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी, दहिसरचा टोलनाका सदर दोन्ही ठिकाणी होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली. भाजपचे माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी तर टोलनाका वरसावे येथे होऊ देणार नाही सांगत आंदोलनाचा इशारा दिला. लोकांची बैठक घेतली. वरसावे येथे टोलनाका होऊ देणार नाही अशी भूमिका घेतानाच दुसरीकडे दहिसर टोलनाका स्थलांतरित झाला नाही म्हणून प्रश्न वैती यांनी उपस्थित केला. सासुनवघर आदी भागातील काँग्रेस नेते विजय पाटील, त्यांचे पुतणे भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील यांनी देखील महामार्ग प्राधिकरणचा निषेध करत टोलनाका खाडी पलीकडे महामार्गावर उभारण्यास विरोध चालवला.
भाजपाकडून टोलनाका अन्यत्र उभारण्यास विरोध केला जात असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मंत्री सरनाईक यांना लेखी पत्र देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गवर टोलनाका उभारणीस नकार दिला. मंत्री सरनाईक यांनी गडकरी यांना भेटून टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर हलवण्याची मागणी केली होती. त्यावर गडकरी यांच्या पत्रात, दहिसर टोलनाका स्थलांतर मुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दोन टोलप्लाझामधील अंतर हे ३० किमी पर्यंत होईल. राष्ट्रीय महामार्गावर गैर राष्ट्रीय टोलप्लाझाचे स्थलांतर हे राष्ट्रीय टोल धोरणांशी सुसंगत नाही. दहिसर टोलनाका वरील गर्दी कमी करण्यासाठी तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारातील महामार्गावर स्थलांतरित करण्या ऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना गडकरी यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पत्राने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याचा मार्ग बंद झाला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील, टोलनाका हटवल्याचे मंत्री सरनाईक यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडवली आहे. मंत्री सरनाईक यांनी टोलनाका हटवणार असे दिलेले आश्वासन हे टोलनाका ५ - १० फूट हटवून पूर्ण केले आहे. त्यांनी ट्राफिक हटणार कि नाही हे सांगितले नव्हते असा चिमटा आ. मेहतांनी काढला आहे.
इतक्या वर्षांची सर्वात मोठी दहिसर टोलनाक्याची समस्या दूर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. त्यामुळे मीरा भाईंदर, वसई विरार सह हजारो लोकांची वाहतूक कोंडीच्या जाचातून सुटका झाली असती. मात्र टोलनाका हटवण्याचे श्रेय शिवसेनेला मिळू नये व जनतेचे टोलनाका मुळे होणारे हाल सुरूच रहावेत असे काही राजकीय नेत्यांना वाटत असल्याने त्यांनी विरोध केला असे शिंदेसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग यांनी सांगितले.