चार हजारांच्या खंडणीसाठी दोन तरुणांचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST2021-02-23T05:00:44+5:302021-02-23T05:00:44+5:30

ठाणे : अवघ्या चार हजारांच्या खंडणीसाठी कोपरीतील हर्षद गायकवाड (१७, रा.कोपरी, ठाणे) याच्यासह दोन तरुणांचे अपहरण करून तलवार आणि ...

Attempted murder by kidnapping two youths for a ransom of Rs 4,000 | चार हजारांच्या खंडणीसाठी दोन तरुणांचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न

चार हजारांच्या खंडणीसाठी दोन तरुणांचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न

ठाणे : अवघ्या चार हजारांच्या खंडणीसाठी कोपरीतील हर्षद गायकवाड (१७, रा.कोपरी, ठाणे) याच्यासह दोन तरुणांचे अपहरण करून तलवार आणि चाकूने त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुण तायडे उर्फ काळ्या (१९, रा.कोपरी) याच्यासह पाच जणांना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या इतर पाच साथीदांराचा शोध सुरू असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.

तायडे, तसेच त्याचे साथीदार सनी तेलुरे, असिफ छपरबंध, यश गाडे आणि रोहन डावरे आदी दहा जणांच्या टोळक्याने हर्षद व त्याचा मित्र आकाश यादव याच्याकडे १८ फेब्रुवारी रोजी चार हजारांच्या खंडणीची मागणी केली. ती पूर्ण न केल्याने सनी तेलुरे, तसेच त्याच्या अन्य चार साथीदारांनी हर्षद याला आनंदनगर चेकनाका येथून एका रिक्षामध्ये जबरदस्तीने कोंबून महात्मा फुलेनगर, कळवा येथील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तिथे सनीने तलवारीच्या उलट्या बाजूने हर्षदच्या डोक्यात प्रहार केले. असिफ याने चाकूने हर्षदच्या डाव्या हातावर, पाठीवर वार केले. इतरांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आकाश यादव याला तरुण तायडे, तसेच त्याच्या चार मित्रांनी जबरदस्तीने एका रुग्णवाहिकेमध्ये बसवून शास्त्रीनगर, वर्तकनगर येथील एका मैदानात नेऊन त्याच्यावर तलवारीच्या उलट्या बाजूने पाठीवर आणि मायकल याने लोखंडी रॉडने उजव्या पायावर मारहाण केली. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात हाणामारी, खंडणी, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दहा जणांविरुद्ध १९ फेब्रुवारी रोजी दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मनिषराजे पठाणे हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

....................................

अटकेतील आरोपींपैकी एक जण अल्पवयीन असून, त्याला भिवंडी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Attempted murder by kidnapping two youths for a ransom of Rs 4,000