मोहोळवर जलसंकट, पाणीसाठा उरला फक्त २० दिवसांपुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 15:38 IST2019-04-22T15:35:01+5:302019-04-22T15:38:49+5:30
मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे.

मोहोळवर जलसंकट, पाणीसाठा उरला फक्त २० दिवसांपुरताच
अशोक कांबळे
मोहोळ : ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. दीड महिन्यात ३ मीटरने पाणी पातळी कमी झाली असून, उरलेला पाणीसाठा केवळ २० दिवस पुरेल, एवढाच उरला आहे.
चालूवर्षी तालुक्यासह शहर परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने परिसरातील विहिरी व बोअर आताच बंद पडू लागले आहेत. भविष्यात शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत ४० ते ४५ हजार लोकसंख्या असणाºया मोहोळ शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. बंधाºयात पाणी राहिले तरच शहराला पाणी मिळणार, अशी अवस्था शहराची आहे.
उजनी धरणातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पाणी सोडण्यात आले होते. पाणी संथगतीने पोहोचले होते. बंधारा चार मीटरने भरला होता. परिसरातील वीजपुरवठा खंडितही केला आहे, परंतु चोरुन व सिंगल फेज लाईनवर चालणारे नवीन विद्युत पंप सर्वांकडे असल्याने नदी परिसरात रात्रंदिवस पाणी उपसा सुरु आहे. याकडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. यामुळे बंधाºयातील पाणी दीड महिन्यातच तीन मीटरने कमी झाले आहे. आजमितीला एक मीटर इतकेच पाणी शिल्लक राहिले असून ते केवळ २० दिवस पुरेल इतकेच आहे.
मुख्याधिकारी म्हणतात, निवडणुकीमुळे दुर्लक्ष
- याबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, मागील महिनाभरात महसूल विभागाने निवडणुकीसाठी नगरपरिषदेची सर्वच यंत्रणा गुंतविल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष झाले. याशिवाय वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याबाबत सहकार्य केले नाही. पाटबंधारे विभागाची ही कसलीच मदत मिळाली नसल्याने ही पाणी पातळी घटल्याचे ते म्हणाले. शिल्लक राहिलेल्या पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करून हे पाणी पुरविण्याबाबत तातडीने उपाय योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहोळ शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सीना नदीद्वारे ५ मार्च २०१९ दरम्यान कोळेगाव बंधाºयात पाणी पोहोचले होते. चार मीटर क्षमतेने बंधारा भरून देण्याचे आम्ही काम केले आहे .
- वाय.व्ही. पाटील
कालवा निरीक्षक,
पाटबंधारे विभाग, मोहोळ